– प्रमोद ठोंबरे
बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी एक तास ही संकल्पना सध्या बारामती शहरात जोर धरत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ही संकल्पना रुजताना दिसत आहे. बालेकिल्ल्यात देखील राष्ट्रवादीला बळकटी देण्याचे काम उपक्रमांतर्गत होत आहे. राष्ट्रवादीची ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी लोकसहभाग आणि जनसंपर्कावर भर दिला आहे. त्यामुळे ही संकल्पना बारामती शहरात चांगलीच रूजली आहे.
बारामती शहरात मात्र हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. नागरिकांच्या दारोदारी जाऊन प्रश्न सोडवले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी दारोदारीचा जागर सध्या बारामती शहरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रवादीसाठी एक तास ही संकल्पना पुढे आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा विचार व्यक्त केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पाठिंबा दिला.
एक तास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी ही चळवळ सुरू झाली. राज्यातील काही ठिकाणी महिन्यातील पहिल्या शनिवारी हा उपक्रम राबविला जात आहे. बारामती शहरात, मात्र महिन्यातील चारही शनिवार हा उपक्रम राबला पाहिजे, असा निर्णय शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतला.
विरोधी पक्षनेते पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात झाली. शहरातील पदाधिकाऱ्यांची टीम प्रभागात पोहोचत आहे. स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने तेथील समस्यांचे निराकरण केले जात आहे. सार्वजनिक तसेच वैयक्तिक देखील समस्या सुटत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पटवून दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाहीतर कुटुंब असल्याची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवली जात आहे.
नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्यातील संवाद या उपक्रमामुळे वाढू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहरातील सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ घट्ट होत आहे. नगरपरिषद, बांधकाम, विद्युत, महसूल आदी विभागातील समस्या सोडवल्या जात आहेत.
समस्यांबाबत नागरिकांना विचारणा केली जात आहे. नागरिक समस्यांचा पाढा वाचत आहेत. काही प्रश्नांवर तोडगा काढला जात आहे. जटील समस्यांवर अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढली आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सुटली आहेत.
सरकारविरोधात वास्तवतेची जाणीव
महाराष्ट्रातील उद्योग बाहेरील राज्यात कशा पद्धतीने नेले जात आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कसे वाढत आहे. यावर देखील भाष्य केले जात आहे. बारामती विकासाचा पॅटर्न राज्यातच नव्हे तर देशात अवलंबला जात आहे. मात्र, हे सरकार बारामतीच्या विकासाला खेळ बसवण्याचे काम करत आहे.
विकासकामांचे निधी रोखले जात आहेत. विकासाचा पॅटर्न म्हणून उदयास आलेल्या बारामतीकडे सरकारची वक्रदृष्टी आहे. ही बाब देखील जनतेच्या निदर्शनास आणून दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी एक तास या उपक्रमांतर्गत केवळ प्रश्नांची सोडवणूक हा उद्देश न ठेवता नागरिकांना वास्तवाची जाण करून दिली जात आहे.
एकेक नागरिक राष्ट्रवादीला जोडतोय
संवाद घडवून व्यापक दृष्टिकोनातून पक्षाला बळकटी दिली जात आहे. एकेक नागरिक राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. पक्षाची विचारधारा त्याच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. राष्ट्रवादी दारोदारीच्या माध्यमातून पक्षाच्या हिताची व्यापक चळवळ उभी राहत आहे. भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून बारामती घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. एक तास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी हा मास्टर प्लॅन राष्ट्रवादीने देखील तयार ठेवला असून त्याने बारामती शहरात बाळसे धरले आहे.