पुणे – कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री क्षेत्र आळंदीयात्रेसाठी पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. येत्या ६ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान , या कालावधी करिता मार्गावरील ११३ व जादा २२९ सर्व मिळून ३४२ बसेस सोडण्यात येणार आहेत. तर ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी गरजेनुसारही बसेस सोडण्यात येणार आहेत.
तसेच यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येणार आहे.
या जादा बसेस स्वारगेट ते आळंदी, हडपसर ते आळंदी, पुणे स्टेशन ते आळंदी, म.न.पा. भवन ते आळंदी, निगडी ते आळंदी, पिंपरी ते आळंदी, चिंचवड ते आळंदी, देहूगांव ते आळंदी, भोसरी ते आळंदी, रहाटणी ते आळंदी रात्री १२ पर्यंत ही सेवा असणार आहे.
रात्रीच्या तिकिट दरात वाढ
यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बससेवेसाठी दहा नंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा रूपये ५/- जादा तिकिट दर आकारणी करण्यात येईल. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्राकालावधीत रात्री दहा नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.
शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून यात्रा स्पेशल बससेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्र. २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.