Arun Khetarpal | Ikkis | India–Pakistan war – राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा ‘इक्कीस‘ हा सिनेमा सेकंड लेफ्टनंट ‘अरुण खेत्रपाल’ यांच्या जीवनावर आधारित आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमध्ये दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना ‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम गाजवला होता. नुकतंच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला असून, चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. पुण्याचे सुपुत्र आणि लष्करी वारसा : अरुण खेत्रपाल यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५० रोजी पुणे शहरात झाला. त्यांच्या नसांतच देशभक्ती धावत होती. त्यांचे पणजोबा शीख सैन्यात होते, आजोबांनी पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवले होते आणि वडील एम. एल. खेत्रपाल हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते त्यामुळे अरुण यांना देशाची सेवा करण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध लॉरेन्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले अरुण अभ्यासात खूपच हुशार होते आणि त्यांना क्रिकेटचीही प्रचंड आवड होती. १९७१ चे युद्ध आणि थरारक लढाई : १९७१ च्या भारत-पाक युद्धात पंजाबमधील ‘शकरगड’ सेक्टरमधील बसंतर नदीचा भाग ताब्यात ठेवणे (आजचा बांगलादेश) भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. पाकिस्तानला हा भाग जिंकून काश्मीरचा भारताशी असलेला संपर्क तोडायचा होता. १५ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने बसंतर नदीवरील पुलावर ताबा मिळवला पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना पाकिस्तानच्या १३ लान्सर्स या रेजिमेंटचा सामना करावा लागला. त्यावेळी आसपासच्या संपूर्ण परिसरात पाकिस्तानी सैन्याने भूसुरुंग लावलेले होते. तरी देखील लेफ्टनंट कर्नल हनुत सिंग यांच्या नेतृत्वाखालील खेत्रपाल यांच्या रेजिमेंटने आपल्या जीवाची पर्वा न करता भूसुरुंगांच्या जाळ्यातून आगेकूच सुरूच ठेवली. लष्कराच्या अधिकृत निवेदनानुसार,अवघ्या २१ वर्षांच्या अरुण खेत्रपाल यांनी आपल्या ‘फामागुस्ता’ नावाच्या रणगाड्यातून शत्रूवर असा हल्ला चढवला की पाकिस्तानचे रणगाडे एकामागून एक उद्ध्वस्त होऊ लागले. त्यांनी एकट्याने शत्रूचे १० पेक्षा जास्त रणगाडे निकामी केले होते. युद्धादरम्यान अरुण खेत्रपाल यांच्या रणगाड्याने पेट घेतला होता. त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांना रणगाडा सोडून सुरक्षित बाहेर येण्याचे आदेश दिले. मात्र, अरुण खेत्रपाल यांनी रेडिओवरून दिलेले उत्तर आज देखील इतिहासात अजरामर झाले. “नाही सर, मी रणगाडा सोडणार नाही. माझ्या रणगाड्याची मुख्य तोफ अजूनही कार्यरत आहे आणि मी या हरामखोरांना धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही!” आपला रणगाडा जळत असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गोळीबार सुरू ठेवला आणि शत्रूला एक इंचही पुढे सरकू दिले नाही. या धुमश्चक्रीत त्यांना वीरमरण आले. सर्वात तरुण ‘परमवीर चक्र’ विजेते : वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी दाखवलेल्या या असीम धैर्यासाठी भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ देऊन सन्मानित केले. हा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळवणारे ते आजवरचे सर्वात तरुण मानकरी ठरले आहेत. तसेच, पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) मधील मुख्य परेड ग्राउंडला ‘खेत्रपाल परेड ग्राउंड’ असे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ज्या ‘फामागुस्ता’ रणगाड्यातून त्यांनी युद्ध केले, तो रणगाडा आजही अहमदनगरच्या (अहिल्यानगर) लष्करी संग्रहालयात गौरवाने ठेवलेला आहे. अरुण खेत्रपाल आपल्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ते ओळखले जात होते, मात्र कर्तव्याच्या बाबतीत ते अत्यंत कठोर आणि शिस्तप्रिय होते. आज देखील त्यांची शौर्यगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कुटुंबीयांना पत्र : दरम्यान, खेत्रपाल यांच्या बलिदानानंतर काही दिवसांतच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना स्वत: पत्र लिहिले होते. संपूर्ण देश आपल्या दुःखात सहभागी आहे. देशाच्या रक्षणासाठी अरुण यांनी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नाही. या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला शांती आणि धैर्य लाभो अशी आम्ही प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी या पत्रात नमूद केले होते ‘इक्कीस’ चित्रपटाबद्दल थोडक्यात : दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी ही शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडली आहे. सिनेमात मुख्यभूमीकेत अमिताभ बच्चन यांचा नातू ‘अगस्त्य नंदा’ हा ‘अरुण खेत्रपाल’ यांची भूमिका साकारत आहे. तर, अभिनेते धर्मेंद्र यांनी अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची (कर्नल एम. एल. खेत्रपाल) अत्यंत भावूक भूमिका साकारली आहे. या चित्रपटात केवळ युद्धच नाही, तर एका वडिलांचा आपल्या शहीद मुलाबद्दलचा अभिमान आणि तो काळ दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट हा १ जानेवारी २०२६ रोजी, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे.