श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे थाटात शुभारंभ
जुन्नर – अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रापैकी एक असलेले श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरीजात्मज गणपतीस अर्पण केलेल्या हार, दुर्वा, फुले या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती उपक्रमाचा सोमवारी (दि. 6) शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
अष्टविनायकापैकी एक असलेले व कोरीव लेण्याच्या सानिध्यात वसलेले श्रीक्षेत्र लेण्याद्री येथील मंदिरामध्ये श्री गिरीजात्मज गणपती चरणी भाविकांकडून अर्पण केले जाणारे हार, दुर्वा, फुले यांचे मोठया प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्याचे पावित्र्य जपण्याकरीता त्यावर प्रक्रिया करुन त्या पासून सुगंधीत अगरबत्ती बनविण्याचा संकल्प ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केला.
जेणे करुन भाविकांने वाहिलेल्या फुलांचा सुगंध या अगरबत्तीच्या माध्यमातुन सतत दरवळत राहील व अगरबत्तीचे विभूतीतुन भाविकांना श्री गिरीजात्मज गणेशाचा आशिर्वाद प्राप्त होईल. या सुगंधी अगरबत्ती निर्मिती रेफ्लो नॅचरल्स कंपनी यांच्या मार्फत केली जाणार आहे.
या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती उपक्रमाचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्थ गोविंद मेहेर, सदाशिव ताम्हाणे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे, रेफ्लो नॅचरल्स कंपनीचे संस्थापक श्रीराम कुंटे, विजय जायभाये व गोळेगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आला.