बारामती : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने शर्तीचे प्रयत्न सुरू असतानाही हे आंदोलन अद्याप संपलेले नाही. तर, दुसरीकडे आता ओबीसी समाजाने देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. २७ टक्के आरक्षणात ३५० पेक्षा अधिक जाती समाविष्ट आहेत.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी ओबीसी, बहुजन समाज बांधवांमध्ये एकजुटीसाठी गाव चलो अभियानाच्या माध्यमातून खोरवडी, दौंड शहरातील ओबीसी, बहुजन बांधवांच्या गावा-गावांत जाऊन सकल बैठका सुरू असल्याची माहिती अॅड प्रियदर्शनी कोकरे यांनी दिली.
महारात सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात गाव चलो अभियानाच्या माध्यमातून ओबीसी, बहुजन बांधवांना एकत्रित करून चर्चा विनिमय करण्यासाठी या दौऱ्यादरम्यान खोरवडी (ता.दौंड) येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी अॅड प्रियदर्शनी कोकरे बोलत होत्या. याप्रसंगी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक बापूराव सोनवलकर, भारतरत्न कोकरे, सोनबा दगडे, धुळा शिंदे, अण्णा दगडे, ओबीसी बांधव उपस्थित होते.
आधीच ओबीसी प्रवर्गात असलेल्या ३५० पेक्षा जास्त जातींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. या २७ टक्के आरक्षणापैकी काही जिल्ह्यांत १९ टक्के, तर अनेक ठिकाणी त्या खालोखाल आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्ग ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असताना आरक्षण त्या मानाने कमी आहे.
असे असताना मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आला, तर आरक्षण गिळंकृत करेल, अशी शक्यता ओबीसी समाजाकडून व्यक्त होत आहे. यावर विचारविनिमय करण्यासाठी व्यापक जनसंपर्कासाठी गावोगाव फिरून सकल ओबीसी बांधवांच्या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती यशवंत ब्रिगेडचे संस्थापक बापूसाहेब सोनवलकर यांनी दिली.