नारायणगाव,- कुकडी प्रकल्पांतर्गत येणारे सर्व कालवे दुरुस्त करणे गरजेचे असून त्यासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे. कुकडी प्रकल्प 35 ते 40 वर्षे जुना आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कालव्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे असून सुरुवातीस पिंपळगाव जोगे, वडज, माणिक डोह, डिंभे, येडगाव धरणाच्या सगळ्या भिंतींचे लिकेजेस, भिंतींचे झालेले नुकसान व तेथील मेकॅनिकल गेट तसेच धरणांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले असल्याचे नमूद केले.
आमदार बेनके म्हणाले की, कुकडी प्रकल्पातील सगळे कालवे स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. कुकडी प्रकल्पातील डिंभे उजवा-डावा, घोड, मीना, पिंपळगाव जोगा, कुकडी कालवा यातील दगड धोंडे बाहेर काढणे, पाण्याचा प्रवाह प्रवाहित करणे, त्यातील झाडे झुडपे काढून कालवा चांगला करणे असे काम हाती घेतले आहे. परंतु निधीची कमतरता व यंत्रणा कमी असल्याने पूर्ण होऊ शकले नाही.
त्याचबरोबर शून्य ते चाळीस पिंपळगाव जोगा धरणाचे लिकेजेस काढण्याचे काम व जिथे जिथे कुकडी कालव्यांची दुरवस्था होऊन फुटीचा प्रश्न निर्माण झाला होता तिकडे तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. अजूनही अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम करणे गरजेचे असून त्याचा प्लॅन तयार आहे. त्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी शासन दरबारी मागणी केली आहे. ज्यावेळी कालव्यातून पाणी वाहते त्यावेळी पूर्वभागातील लाभधारक शेतकर्यांना पाणी मिळाले नाही तर अडचणी निर्माण होतात. म्हणून लाभधारक क्षेत्रातील आमदार एकत्र येऊन कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.