पुणे – ‘प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी पुण्यातील शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे असतात. शिवाय, विविध सामाजिक संस्थांना उभारी देण्याचे काम ते करत आहेत. नि:स्वार्थ सेवा अन् निष्काम कर्मयोगी असे भाऊसाहेब जाधव हे एक लक्षणीय व्यक्तिमत्त्व आहे,’ अशा शब्दांत मान्यवरांनी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष आणि प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
मराठवाडा मित्र मंडळ, पुणे आणि प्राचार्य भाऊसाहेब जाधव सुहृद मंडळातर्फे प्राचार्य जाधव यांचा अमृत महोत्सवी सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात झाला. यावेळी “सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य जाधव व सौ. रंजना जाधव यांचा गौरव करत “अमृत महोत्सवी गौरव’ विशेषकांचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रतापराव पवार म्हणाले, ‘नेहमी हसतमुख व मेहनती असे जाधव यांनी चाकोरी बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना मदत करतात. त्यांचे कार्य प्रेरणा देणारे असून, कोणताही भेद न मानणारे त्यांचे व्यक्मितत्व आहे.’ डॉ. काळकर म्हणाले, “एमएमसीसी’ सुरू करण्यात जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळातून काम करत त्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविला. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मदत केली. पण त्याची नोंद कुठेच ठेवली नाही.’
गणगे म्हणाले, “जाधव यांनी प्रामाणिकेतची साथ कधीच सोडली नाही. संस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. ‘आधुनिक संत’ तसेच “निष्काम कर्मयोगी’, असे त्यांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही.’ यावेळी कारगिल युद्धातील शूरवीर परमवीरचक्र विजेते कर्नल ललित राय यांनी जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक प्राचार्य देविदास गोल्हार यांनी केले. प्रा. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन, तर प्राचार्य क्रांती देशमुख यांनी आभार मानले. या सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्राचार्य जाधव यांचे स्नेहीजन उपस्थित होते.
चांगली माणसे जोडत गेल्यानेच सत्कार्य करू शकलो : प्राचार्य जाधव
आई-वडिलांकडून संस्काराची शिदोरी पुढे नेत प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी आपला प्रवास मांडला. यावेळी ते भावूक झाले. जाधव म्हणाले, “आपण मोठ्या कष्टातून पुढे आलो. तीच परिस्थिती अन्य विद्यार्थ्यांवर येऊ नये, या भावनेतून विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. जीवनात काही ठरवून कार्य केले नाही. मात्र चांगली माणसे जोडत गेल्याने काही कार्य करू शकलो. कोणाच्या फंदात न पडता नि:स्वार्थपणे काम केल्याचा आनंद आहे.’
“आम्ही सैनिक देशाच्या सीमेचे संरक्षण करतो. पण, प्राचार्य भाऊसाहेब जाधव हे खऱ्या अर्थाने योद्धे आहेत. सैनिक कधीही नममस्तक होत नसतो, पण मी प्राचार्य जाधव यांना वंदन करतो.” – कर्नल ललित राय, परमवीरचक्र विजेते
“मराठवाड्यातील व्यक्तीचा पुणेकर मंडळी सत्कार करतात, यावरूनच सर्व काही समजून घ्यायला हवे. मराठवाडा मित्र मंडळ हे विद्यार्थ्यांचे मायपोट आहे. प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्याकडे विद्यार्थी आशेने जातात. त्यांनी जीवनाला अर्थप्राप्त करून दिला. पुण्यात शिक्षण संस्थांचे जाळे विस्तारणे हे सोपे काम नाही. त्यामुळे त्यांचे कौतुक.” – गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ज्ञ