पिंपरी – परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून, रेंगाळलेल्या पावसाने शहराच्या विविध भागांत शनिवारी (दि.10) दमदार हजेरी लावली. शहराच्या सखल भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यामधून वाट काढावी लागली. बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनोत्तर पाऊस काही दिवस रेंगाळण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेनुसार मान्सून राज्याच्या उत्तर भागातून 5 ऑक्टोबरला माघार घेण्याची शक्यता होती. तर मुंबईतून माघार घेण्याची तारीख 8 ऑक्टोबर होती. मात्र, चालू वर्षी हवामान विभागाने परतीच्या पावसासाठी 17 ऑक्टोबर ही नवीन तारीख जाहीर केली आहे. गेल्या बारा दिवसांत परतीच्या मान्सूनने अरबी समुद्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून माघार घेतली आहे. मागील पाच ते सहा दिवसांत राज्यातील वातावरणात वेगाने बदल झाल्याने दोन दिवसांपासून विविध भागांत पाऊस पडत आहे. सध्या राज्यात पावसाचा प्रभाव वाढला असून राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून अनेक भागात पाऊस पडत असल्याची स्थिती आहे.