वंदना बर्वे
मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये यूपीवासीयांनी राज्याची धुरा एकाच पक्षाच्या हाती दिली असली, तरी लहान पक्षांशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, याची जाणीव भाजपला बऱ्यापैकी झाली असावी. कदाचित म्हणूनच अनुप्रिया पटेल आणि संजय निषाद यांच्या मागणीपुढे भाजपला नमते घ्यावं लागले!
यूपीची निवडणूक लढाई आता पूर्ण रंगात आली आहे. लखनौच्या गादीचा खरा रणसंग्राम भाजप आणि समाजवादी या दोन पक्षात रंगणार आहे आणि कोणता पक्ष कुणाच्या बाजूने लढणार हेही आता स्पष्ट झाले आहे. आता यूपीचा मतदार कोणत्या पक्षाला लखनौच्या गादीवर बसवितो हे पाहण्यासाठी 10 मार्चच्या निकालाची वाट बघावी लागेल!
उत्तर प्रदेश विधानसभेच्या मागील तीन निवडणुकांचा इतिहास बघितला तर असे लक्षात येते की, मतदारांनी तिन्हीवेळा राज्याची सत्ता एकाच पक्षाच्या हाती सोपविली आहे. 2007 च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या पक्षाच्या झोळीत 206 जागा टाकून लखनौच्या गादीवर बसविले होते. यानंतर 2012 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पक्षाला 224 जागा दिल्या आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोपविली. 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात 312 जागांचं दान टाकून योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनविले. यूपीत विधानसभेच्या 403 जागा आहेत आणि पूर्ण बहुमतासाठी 202 जागांची गरज असते, हे येथे उल्लेखनीय.
पंधरा वर्षांची एकाच पक्षाच्या हाती राज्याची धुरा सोपविण्याची श्रृंखला 2022 च्या निवडणुकीतही कायम राहील असे चित्र आहे. अर्थातच, यूपीचा 23 वा मुख्यमंत्री भाजप किंवा सपा या पक्षातूनच कुणीतरी राहणार आहे. हे पूर्ण स्पष्ट असूनदेखील या दोन्ही पक्षांना लहान-लहान पक्षांची मनधरणी करावी लागत आहे. भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षाची अपना दल (सोनेवाल) आणि निषाद पक्षाची युती झाली असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. ही प्रेस कॉन्फरन्स लखनौमध्ये झाली आणि यात सहभागी होण्यासाठी यूपीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि नड्डा दिल्लीहून आले होते. याच कॉन्फरन्समध्ये अनुप्रिया पटेल आणि डॉ. संजय निषाद हेही उपस्थित होते.
मात्र, प्रेस कॉन्फरन्स तीन वाजता सुरू होणार होती. एवढ्यातच अडीचच्या सुमारात अनुप्रिया पटेल यांनी कॉन्फरन्समध्ये येण्यास नकार दिला. यामुळे भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. भारतीय जनता पक्ष अपना दलाला नेमक्या किती जागा देणार आहे? हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण भाजपच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर बसणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. अनुप्रिया पटेल यांनी 20 जागांची मागणी केली. शेवटी 18 जागांवर समझोता झाला. डॉ. संजय निषाद यांच्या निषाद पक्षाला 10 जागा देण्याचे ठरले. थोडक्यात, लखनौच्या गादीपर्यंत पोहोचण्यासाठी शिडी म्हणून लहान-लहान पक्षांची गरज पडणार आहे.
जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल
अखिलेश यादव यांनी चार-सहा महिन्यांपूर्वीच स्व. चौधरी अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हा यूपीचा इतिहास आहे की जेव्हा-जेव्हा उत्तर प्रदेशात राष्ट्रीय पक्ष मजबूत होतो तेव्हा तेव्हा प्रादेशिक पक्षांना नुकसान सहन करावे लागते.सहारनपूरपासून मेरठ, मुझफ्फरनगर आणि बिजनौर या भागात प्रभाव असलेला राष्ट्रीय लोकदल याचं उत्तम उदाहरण आहे.
2014 आणि 2017 च्या निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपच्या धोक्यामुळे राष्ट्रीय लोकदलाला सर्वाधिक फटका बसला होता.
चौधरी अजित सिंह यांनी 1996 मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर हळूहळू या पक्षाने राज्यात आपले स्थान निर्माण केले. 2002 च्या बसपा सरकारमध्ये आरएलडीला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली होती. 2004 च्या निवडणुकीत आरएलडीने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या. 2014 मध्ये 10 वर्षांनंतर आरएलडीने यूपीएच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली आणि सर्व जागा गमावल्या. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आरएलडीला फक्त एक जागा मिळाली आणि शेवटी ती जागाही गमावली.
अनुप्रिया पटेल यांचा अपना दल
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात, विशेषतः वाराणसी आणि आसपासच्या कुर्मी मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा अपना दलाने भाजपसोबत युती केली आहे. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्यासोबत काम करणारे डॉ. सोनेलाल पटेल यांनी 1995 मध्ये अपना दलाची स्थापना केली होती. आता अनुप्रिया पटेल या पक्षाच्या प्रमुख आहेत. उत्तर प्रदेशात ब्राह्मण, ठाकूर, दलित आणि मुस्लीम हा वर्ग संपूर्ण राज्यात व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही लोक आहेत. इतर जातींचे वेगवेगळे क्षेत्र आणि या भागात बाराबंकी ते बहराइच, बनारस ते सोनभद्र, फतेहपूर ते बुंदेलखंड अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे कुर्मी समाजाचे नेते आहेत.
मात्र, तिन्ही भागांचं नेतृत्व करतो असा एकही नेता नाही. बाराबंकीपासून बहराइचपर्यंत बेनीप्रसाद वर्मा होते, बनारसमध्ये सोनेलाल पटेल होते आणि आता अनुप्रिया पटेल आहेत… अशा परिस्थितीत या जाती आपले नेते बदलत आहेत. अनुप्रिया पटेल सध्या मिर्झापूरमधून खासदार आहेत आणि उत्तर प्रदेश विधानसभेत नऊ आमदार आहेत. अनुप्रिया पटेल आणि त्यांची आई कृष्णा पटेल यांच्यात छत्तीसचा आकडा आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष
राजभर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी सपाशी आघाडी केली आहे. राजभर यांनी अलीकडेच भाजप नेते आणि मंत्री सपाकडून तिकीट मिळण्याची वाट पाहात असल्याचा दावा करून यूपीच्या राजकारणात खळबळ माजविली होती. कारण, हे विधान त्यांनी भाजप नेते दयाशंकर सिंह यांच्या भेटीनंतर केले होते. यामुळे याची चर्चासुद्धा खूप झाली.
2017 मध्ये राजभर यांनी भाजपच्या मदतीने चार जागा जिंकल्या होत्या; परंतु आता त्यांची महत्त्वाकांक्षा गगनाला भिडली आहे. राजभर हे भाजपसाठी सध्या आव्हान बनले आहे. गेल्या निवडणुकीत राजभर भाजपसोबत लढले नसते, तर त्यांनी कितीही दावा केला तरी राजकीय यशाच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती आता दिसली नसती. 2002 मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशातील सुमारे दोन डझन जागांवर आहे. तर राजभर यांच्यामते, राज्यातील 100 जागांना आपला समाज प्रभावित करू शकतो.
केशवदेव मौर्य यांची ग्रेट टीम
2008 मध्ये बहुजन समाज पक्षापासून वेगळे झाल्यानंतर “महान दला’ची स्थापना करणारे केशवदेव मौर्य यांनी अलीकडेच समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. यूपीतील मौर्य, भगत, भुजबळ, सैनी आणि शाक्य अशा अनेक जातींचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे केशवदेव मौर्य यांचा पश्चिम उत्तर प्रदेशातील काही विधानसभांमध्ये चांगला हस्तक्षेप असल्याचे मानले जाते. याशिवाय स्वामी प्रसाद मौर्य हेही या समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी अलीकडेच भाजप सोडून सपात प्रवेश केला आहे.
निषाद पक्ष
यूपीतील निवडणुकीच्या दृष्टीने नदीकाठी वास्तव्य करणारा निषाद हा समुदाय अतिशय खास आहे. प्रत्येक नदीच्या काठावर निषाद समाज आढळून येतो. गाझियाबाद आणि नोएडापासून ते पूर्वांचलमध्ये अलाहाबादपासून गंगेच्या काचार प्रदेशात इतर ठिकाणी निषाद समाजाचा प्रभाव आहे. निषाद पक्षाचे नेते डॉ. संजय निषाद यांनी अलीकडेच भाजपसोबत युती केली आहे. याशिवाय शिवपाल यादव ते पीस पार्टी असे अनेक छोटे पक्ष आहेत.