कांदा व बटाट्याचीही निर्यात बंद
नवी दिल्ली, दि. 25 – बटाटे व कांदा यांची निर्यातही केंद्र सरकारने बंद केली आहे, असे अधिकृतरित्या सांगण्यात आले. ताज्या भाजीपाल्याबरोबर या दोन वस्तूंची निर्यात 19 जुलैपासून बंद करण्यात आली आहे. बटाट्याचे भाव वाढू लागताच गेल्या फेब्रुवारी महिन्यात बटाट्याची निर्यात थांबविण्यात आली होती. तसेच चालू वर्षी तेरा मे पासून कांद्याची निर्यातही थांबविण्यात आली होती. निर्यात बंदी होईपर्यंत एकूण तीन टक्के भाजीपाला निर्यात झाला होता.
जनमत जाणण्यासाठी इंदिराजी बाहेर पडल्या
पवनार – जनतेची काय मते आहेत ती जाणून घेण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी मी बाहेर पडले आहे, असे उद्गार इंदिरा गांधी यांनी काढले. अंगी आत्मविश्वास बाळगून देश स्वावलंबी होण्यासाठी झटावे, असा उपदेश इंदिरा गांधींनी केला. मार्गदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे बघू नये, लोककल्याणाचे अधिकाधिक काम हाती घेण्यासाठी नेत्यांवर दबाव आणावा. भविष्यकाळ डोळ्यापुढे ठेवून निर्धाराने पुढे वाटचाल करावी, असे आवाहनही केले.