पिंपरी,(प्रतिनिधी) – गेल्या वर्षभरापासून मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यातच मार्च महिन्यापासूनच उन्हच्या तडाख्याने नागरिक हैराण झालेले आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अथवा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर परिसरात गेल्या वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा होत असतो, त्याच दिवशी चार ते आठ तास वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
सध्या पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच वीजेअभावी पुरेसे पाणी मिळत नाही. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी दिवसभर असहाय्य उकाडा जाणवत आहे. त्यातच चार-चार तास वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेच वीजेअभावी व्यापारी, विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी यांनाही नाहक त्रास होत आहे.
त्यामुळे मोहननगर येथील सर्वे नंबर १३५, १२६ , लोखंडे हॉस्पिटल परिसर, येवले चाळ, दत्त मंदिर परिसर तसेच चिंचवड़ स्टेशन येथील साईबाबा नगर, कुणाल बिल्डिंग, दावाबाज़ार, गावडे चाळ, रेल्वे आरक्षण केंद्राचा परिसर ते श्रेयांस अपार्टमेंट पर्यंतचा परिसर, काळभोर नगर परिसर येथील वीजपुरठा सुरळीत करून नगारिकांना दिलासा द्यावा. समस्येचे निराकरण करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे निवेदन सामजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांनी महातरणच्या आकुर्डी येथील कार्यालय, कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे.