राहुल गोखले
नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे राजकारणाचा पोत किती घसरला आहे हे चिंताजनक वास्तव अधोरेखित झाले आहे.
लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा आरोप असलेले आशिष मिश्रा यांना जनरेट्याखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली. आशिष मिश्रा यांचे वडील अजय मिश्रा हे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत. वडील म्हणून आपल्या चिरंजीवांना कायदेशीर लढ्यात साथ देणे हा अधिकार अजय मिश्रा यांना अवश्य आहे. मात्र, मंत्री म्हणून ती भावना प्रबळ होऊन आपल्या मर्यादा विसरण्याचा अधिकार त्यांना नाही. पण त्या मर्यादेचे विस्मरण अजय मिश्रा यांना झाले आणि त्यांनी थेट पत्रकारांना “लक्ष्य’ केले.
लखीमपूर येथेच एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मिश्रा आले असता वार्ताहरांनी त्यांना स्वाभाविकपणे आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांविषयी प्रश्न विचारला. तेव्हा मंत्री बिथरले आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या वार्ताहराला धक्काबुक्की केलीच शिवाय पत्रकारांना “चोर’ संबोधले. वार्ताहरांनी सत्तेला प्रश्न विचारायचे नाहीत तर कोणाला विचारायचे? एवढे सामान्य भानही मिश्रा यांना राहिले नाही. मिश्रा यांच्या या वर्तनावर विरोधकांनी एकच रान पेटविले.
वस्तुतः मिश्रा यांनी स्वतः या घटनेनंतर राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांनी ती तयारी दर्शविली नाही तर पंतप्रधानांनी अशा मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवणे अभिप्रेत होते. प्रश्न अशा मंत्र्याला वाचवण्याचा केवळ नाही; अशाने असल्या वावदूक राजकारण्यांची भीड चेपते आणि मग हे थिल्लरपणाचे लोण पसरायला वेळ लागत नाही.
कर्नाटकात कॉंग्रेस आमदार के. आर. रमेश कुमार यांनी अत्यंत अश्लाघ्य उद्गार विधानसभेत बोलताना काढले. रमेश हे स्वतः विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत आणि तरीही विधानसभेच्या प्रतिष्ठेची आब त्यांनी ठेवली नाही. अर्थात, ते अध्यक्ष असतानाही त्यांनी याच शब्दांचा उल्लेख केला होता. आताही रमेश यांच्या विधानावरून समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला या लज्जास्पद विधानाची दखल घेत आपल्याला हे विधान पूर्णतः अमान्य आहे, असे स्पष्ट करावे लागले.
खुद्द रमेश यांनी क्षमा मागितली हेही खरे. पण मुळात अशी अश्लाघ्य विधाने करणाऱ्यांना क्षमा मागण्याची संधी देऊन त्यांच्या अशा अक्षम्य चुकाकडे कानाडोळा करणे हे अधिक गंभीर आहे. प्रियंका गांधी यांनी रमेश यांच्या विधानाचा निषेध केला आणि हे विधान अक्षम्य असल्याचे म्हटले. मात्र तरीही रमेश यांनी ना स्वतःहून आमदारकी सोडली ना कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्यांना आमदारपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले.
विरोधाभास असा की, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी कॉंग्रेसने केली होती; पण आपल्याच आमदाराला घरी बसवण्यास कॉंग्रेस नेतृत्व धजावले नाही आणि उलट मिश्रा यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपने कर्नाटकात मात्र कॉंग्रेसने आपल्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या कथित नकलेने गाजले. अधिवेशन गाजण्यासाठी असला थिल्लरपणा कारणीभूत ठरावा हे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेस नख लावणारे आहे. नकलाकार अनेक राजकीय नेत्यांच्या नकला करीत असतात. त्यांचा हेतू प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा असतो. राजकीय प्रचार सभांमध्ये नेते असल्या नकला करतात तेव्हा त्यांचा हेतू गर्दीचे मनोरंजन करणे हा असू शकतो. मात्र, विधानसभा हे काही मनोरंजन करण्याचे व्यासपीठ नाही.
जाधव यांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार अवश्य आहे जसा तो कोणत्याही सामान्य नागरिकालाही आहे. पण म्हणून पंतप्रधानांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल करण्याची आवश्यकता नाही. भाजपने जाधव यांच्या या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अखेरीस जाधव यांनी क्षमा मागितली आणि प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना नेतृत्वाने जाधव यांच्यावर कारवाई केली नाही, हेही सत्य आहे. अगोदर कोणत्याही पातळीला जायचे आणि नंतर क्षमा मागायची हा पायंडाच राजकारणाच्या आजच्या अवनत अवस्थेला कारणीभूत आहे. मात्र, भाजपने देखील आपण त्याच माळेचे मणी आहोत हे लगेच सिद्ध केले.
आदित्य ठाकरे विधिमंडळात येत असताना पायऱ्यांवर बसलेल्या भाजप आमदारांमधून नितेश राणे यांनी आदित्य यांना खिजवणारे आवाज काढले. त्यावर भाजप नेत्यांनी मिठाची गुळणी धरली आहे. तेव्हा दुसऱ्यावर तुटून पडायचे आणि स्वतःचे मात्र सांभाळून ठेवायचे हा केवळ दुटप्पीपणा नव्हे तर निव्वळ दांभिकपणा आहे तो भारतीय राजकीय व्यवस्थेला पोखरून टाकत आहे.
वास्तविक मिश्रा यांच्यापासून राणे यांच्यापर्यंत सर्वांकडून जे घडले आहे त्याला गफलत किंवा चूक म्हणणे म्हणजे सत्य झाकून ठेवण्यासारखे आहे.
मिश्रा मंत्री आहेत आणि राणे आमदार आहेत, रमेश माजी विधानसभा अध्यक्ष आहेत आणि जाधव विधानसभेत तालिका अध्यक्ष होते. तेव्हा हे सर्वजण अनुभवी आहेत आणि त्याउपर म्हणजे जबाबदारीच्या पदांवर आहेत. त्यांनी जे केले ते चुकून घडले असे मानणे म्हणूनच भाबडेपणाचे. आपण जे बोलतो आहोत, करतो आहोत त्याची प्रतिक्रिया काय उमटू शकेल याचा अंदाज त्यांना नसेल, असेही मानणे बाळबोधपणाचे. पण तरीही ते असे करण्यास धजावतात याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे असल्या प्रमादांना पक्ष नेतृत्व कठोरपणे सजा देत नाही हे.
मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे; पण ती होण्यापूर्वीच पंतप्रधानांनी मिश्रा यांना डच्चू दिला असता किंवा रमेश यांना कॉंग्रेसने आमदारकी सोडण्यास भाग पाडले असते किंवा जाधव यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली असती, भाजपाने नितेश राणे यांच्यावर काही आक्षेप घेतला असता तर यापुढे असला थिल्लरपणा करताना अशा बोलभांड नेत्यांनी दहादा विचार केला असता. हा सर्वपक्षीय वावदूकपणा रोखणे ही आता निवडीची गरज आहे.
पक्ष नेतृत्वाने पक्षीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन व्यापक हितासाठी कठोर होणे निकडीचे आहे. पक्षीय बलाबलाच्या पलीकडे जाऊन भारतीय राजकीय संस्कृतीचे आपण काही देणे लागतो याचे भान आणि जाणीव सर्वपक्षीय नेतृत्वाने ठेवावयास हवी.