पिंपरी, (प्रतिनिधी) – अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी रोजच कोणत्या ना कोणत्या भागामध्ये असते. त्यामुळे महिला, नागरिकांच्या तक्रारीचा तपासासाठी पोलीस विभागाला खूप वेळ लागतो, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अनेकदा तक्रार करायला गेल्यानंतर देखील अनेक अधिकारी ठाण्यामध्ये उपस्थित नसतात. त्यांचा व्हिआयपी सुरक्षेसाठी जास्त वेळ खर्च होतो. अशी माहिती दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक-अध्यक्ष दुर्गा भोर यांनी दिली.
दुर्गा ब्रिगेड तर्फे शहरात विद्यार्थी व महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी विद्या पाटील, स्वाती मुरकर, शैलजा चौधरी, चंदा वानखेडे, साधना दातिर, पद्मा कांबळे, वैभवी शिंदे, ईशानी सुतार, माया खंडागळे, अनिता बलाढ्य, कल्पना बागुल, साक्षी तेली, अंजली सिंग, तनुजा बटवाल, अवंतिका गवस यांच्यासह अभय भोर, कल्पेश मुरकर, अथर्व पकाले, रमेश सकपाळ, महेश ठोंबरे व अनेक तरुण सहभागी झाले होते.
दुर्गा भोर पुढे म्हणाल्या की, अनेक शालेय संस्थेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेज जवळील भागामध्ये असणारे बसथांबे हे शाळेच्या समोर असावे, जेणेकरून विद्यार्थीनींना बसथांब्यापर्यंत जावे लागणार नाही. त्यामुळे टवाळखोर मुलं त्यांचा गैरफायदा घेणार नाहीत. तसेच मुली सुरक्षित घरी पोहोचतील, त्याचबरोबर शासनाने घरोघरी जाऊन सर्वे केला पाहिजे, त्यामुळे किती महिला सुरक्षित आहेत, किती असुरक्षित आहेत? हे समोर येईल. तसेच मधून बऱ्याचशा महिलांच्या समस्या समोर येतील.