नवी दिल्ली – या अर्थसंकल्पाने 100 वर्षांच्या भीषण आपत्तीच्या (कोरोना विषाणू जागतिक महामारी) दरम्यान विकासाचा नवा आत्मविश्वास दिला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळकट करण्याबरोबरच सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर दिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, हा अर्थसंकल्प म्हणजे 100 वर्षांच्या विश्वासाचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या अर्थसंकल्पाचे संपूर्ण लक्ष गरिबांच्या कल्याणावर आहे. रोजगाराच्या संधीही वाढतील. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड या राज्यांकडे लक्ष देण्यात आले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी परिपूर्ण आहे. यामुळे ‘ग्रीन जॉब्स’चे क्षेत्रही खुले होईल. देशात प्रथमच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील भागांसाठी पर्वतमाला योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेमुळे डोंगरावर वाहतुकीची आधुनिक व्यवस्था निर्माण होणार आहे. जनतेची सेवा करण्याचा आमचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे.
गरिबांचे कल्याण हा अर्थसंकल्पातील महत्त्वाचा पैलू –
गरीबांचे कल्याण हा या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक गरीबाला पक्के घर असावे, नळाला पाणी, शौचालय, गॅसची सुविधा या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासोबतच आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही तितकाच भर आहे.
PM मोदी म्हणाले की, 2.25 लाख कोटी रुपयांच्या वर जाहीर केलेला MSP थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. अर्थसंकल्पात एमएसएमईसाठी पत हमी आणि अनेक नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, या अर्थसंकल्पात कर्ज हमीमध्ये विक्रमी वाढ करण्यासोबतच इतर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत उद्योगांसाठी संरक्षणाच्या भांडवली अर्थसंकल्पातील 68 टक्के राखीव ठेवण्याचा भारताच्या MSME क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.
बुधवारी सकाळी अर्थसंकल्पावर सविस्तर बोलणार-
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतातील कोट्यवधी लोकांची श्रद्धा, माता गंगाच्या स्वच्छतेसोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, या पाच राज्यांमध्ये गंगेच्या काठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. उद्या भाजपने मला सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. उद्या 11 वाजता अर्थसंकल्पाच्या या विषयावर सविस्तर बोलेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.