नवी दिल्ली – सध्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार, आरोग्य, इलेक्ट्रॉनिक्स, बॅंकिंग क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी तपशिलात चर्चा केली. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी व्हेंचर कॅपिटल क्षेत्रातील गुंतवणूकदारांबरोबर चर्चा केली होती. अर्थसंकल्प तयार करताना कोणत्या बाबींचा समावेश करण्यात यावा हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे.
ज्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये पायाभूत सुविधा, वाहन, ग्राहक वस्तू, कापड, अक्षय ऊर्जा, आदरातिथ्य, अवकाश तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. स्वतः सीतारामन यांनी विविध उद्योजकांच्या संघटनांशी याअगोदर चर्चा केली आहे.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विविध सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. अर्थव्यवस्था करोनानंतर वेगाने पूर्वपदावर यावी याकरिता कर रचना कशी असावी, त्याचबरोबर कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत या संदर्भात पंतप्रधानांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असल्याचे सांगण्यात आले.
भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढावे यासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच क्षेत्रासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आणखी कोणत्या क्षेत्राचा यामध्ये समावेश करावा याची माहिती सरकार घेत आहे. अशा प्रकारच्या बैठका आगामी काळातही चालू राहण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान कार्यालयातून सुचित करण्यात आले.
बैठकीतून बाहेर आल्यानंतर टीसीएस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले की, विविध क्षेत्रामध्ये भारताची उत्पादकता कशी वाढेल यासंदर्भात पंतप्रधानांनी आमच्याशी चर्चा केली. प्रत्येक क्षेत्रात भारत जगातील पहिल्या पाच देशात असावा असे पंतप्रधानांना वाटते. कोटक महिंद्रा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक म्हणाले की, बॅंकिंग क्षेत्रामधील घडामोडी वेगाने वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ही बैठक दोन तास चालली. आम्ही पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू अशा बऱ्याच मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.