पुणे -राज्यातील पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अशा गोष्टी पुन्हा घडता कामा नयेत तसेच दोषींना कठोर शासन होईल यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उघडकीस आलेल्या सर्व प्रकरणांची कसून तपासणी करण्याचे काम राज्यातील यंत्रणा सक्षणपणे करत आहेत.
त्यामुळे सीबीआयसारख्या यंत्रणेकडे तपास देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी स्पष्टोती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पेपरपुटीच्या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली आहे. याबाबत अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य शासनाची भूमिका मांडली.
उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठमोठे घोटाळे उघडकीस येत आहेत. परंतु स्थानिक यंत्रणा सक्षमपणे काम करत असताना केंद्रीय यंत्रणेकडे तपास सोपविण्याची आवश्यकता नाही. अभिनेता सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाचे पुढे काय झाले हे सर्वांनी पाहिलेच आहे. राज्यातील पेपरफुटीच्या घटना अतिशय गंभीर आहेत. त्या वारंवार कशा घडताय, हे कळत नाही. परंतु सर्व पोलीस यंत्रणा योग्यपद्धतीने तपास करत आहेत. पुण्याचे पोलीस देखील टीईटी गैरव्यवहाराची पाळेमुळे खोदून काढतील, असा विश्वास असल्याचे पवार म्हणाले.