मंचर – आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक मशिदींवरील अनधिकृत भोंगे सुरूच आहेत. त्या सर्व मशिदींवरिल अनधिकृत भोंग्यांवर मंगळवार (दि. 3 मे) पर्यंत कारवाई करण्यात यावी, अन्यथा मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचर येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
न्यायालयाने आदेश देऊनही अनेक मशिदींवरील अनधिकृत भोंगे सुरूच आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदींवरील आणि धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु कारवाई झाली नाही. ध्वनिप्रदूषण कायदा सर्वांना लागू आहे. कोणताही धर्म कायद्यापेक्षा मोठा नाही. नागरिकांच्या आरोग्याला त्रास देण्याचा अधिकार कोणत्याही धार्मिक स्थळाला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरीही आंबेगाव तालुक्याच्या हद्दीतील अनेक मशिदींवरील अनधिकृत भोंगे सुरू आहेत.
त्या सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर 3 मे पर्यंत कारवाई करण्यात यावी. अन्यथा मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालिसा लावण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन देते वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बाणखेले, अशोक शेटे, सागर घुले, विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनाचा स्वीकार मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केला.