महिला सशक्तीकरणाला वाटाण्याच्या अक्षता
उद्या दुसऱ्या टप्प्यात फक्त दोन महिला रिंगणात
वंदना बर्वे
नवी दिल्ली – तसे बघितले तर, मणिपूरमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. मात्र, राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्या महिलांची संख्या “उंट के मुंह में जिरा’ ही म्हण सिद्ध करणारी आहे. मणिपूरमध्ये 265 उमेदवार मैदानात आहेत आणि यात फक्त 17 महिला उमेदवार आहेत. मजेची बाब म्हणजे, दुसऱ्या टप्प्यात फक्त दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शनिवारी (दि. 5 मार्च रोजी) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान केले जाणार आहे. 22 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 92 उमेदवार मैदानात आहे. भारतीय जनता पक्षाच्या एस. एस. ओलिश या चंदेल मतदारसंघातून मैदानात आहेत. तर, कम्युनिस्ट पार्टीच्या येंगखोम रोमादेवी काकचिंग मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 173 उमेदवार मैदानात होते. यात महिला उमेदवारांची संख्या 15 होती.
मणिपूरमधील महिलांनी राज्यांतील सर्व महत्वाच्या चळवळीत हिरिरीने भाग घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे आहेत. एवढेच नव्हे तर, महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. मणिपूरमध्ये 10.57 लाख महिला आणि 9.90 लाख पुरुष मतदार आहेत.
भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी केवळ तीन-तीन महिलांना तिकीट दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीनेही प्रत्येकी दोन उमेदवारांना तिकीट दिले असून जनता दल युनायटेडने केवळ एका महिला उमेदवाराला तिकीट दिले आहे.
आरक्षणाशिवाय प्रतिनिधित्व शक्य नाही
कॉंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ए. के. मीराबाई देवी यांच्या मते, समाज हा पुरुषप्रधान आहे. महिलांना पुरुषांकडून तिकीट हिसकावून घेणे अवघड झाले आहे. किमान 33 टक्के आरक्षणाशिवाय विधानसभेत महिला आमदारांची संख्या खूपच कमी असेल, निवडणूक प्रक्रियेत विविध पातळ्यांवर पुरुषांचे वर्चस्व असेल.
महिलांनी मणिपुरी समाजात एक शक्तिशाली स्थान निर्माण केले असले तरी राजकारणात त्या दिसत नाहीत. कोणताही सार्वजनिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम महिलांशिवाय पूर्ण होत नाही परंतु त्यांना राजकीय किंवा निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखले जाते, असे नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेत्या पुखरंबम सुमती देवी म्हणतात. सुमती या दिवंगत पती डब्ल्यू ब्रजविधू सिंग यांच्या लमशांग या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातू चार पुरुष उमेदवार मैदानात आहेत. ते अपमानास्पद टिप्पण्या करतात, अशी खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखविली आहे.