पुणे – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पदयात्रेने निघाले आहेत. बुधवारी सकाळी पुणे शहरात ही पदयात्रा दाखल झाली. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी प्रचंड संख्येने मराठ्यांचा जनसमुदाय उसळला आहे. दरम्यान, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, असा ठाम निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मनोज जरोंगेंचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या पदयात्रचे स्वागत करण्यासाठी उसळलेल्या जनसागरामुळे मुख्यत: पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. वाहनचालक आणि स्थानिकांनी देखील सहकार्य केल्यामुळे या पदयात्रेचा विनाअडथळा प्रवास सुकर झाला. बुधवारी पहाटेच्या चारच्या सुमारास पदयात्रा नगर रस्त्यावरील वाघोली भागात दाखल झाली. लाखो मराठा बांधव या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. ट्रक, टेम्पो, जीप आणि ट्रॅक्टर, अशी वाहने जरांगे पाटील यांच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या पदयात्रेतील वाहनांची रांग आठ ते दहा किलोमीटरपर्यंत झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून जालना येथील आंतरवली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली. येत्या शुक्रवारी (दि.२६) मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. तर पुण्यातील वाघोली येथून मनोज जरांगे पाटील यांच्या हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी असलेल्या मोर्चाची बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. या दरम्यान कार्यकर्त्यांना पुणे शहर आणि उपनगरातील विविध संस्था, संघटना यांच्या वतीने चहा, नाश्ता, पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
खराडी चौकात भव्य स्वागत
मराठा आरक्षण लढाईतील जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खराडी बायपास चौकात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चौकात दोन मोठ्या क्रेनच्या साहाय्याने जरांगे पाटील यांना भला मोठा हार घालण्यात आला. याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर चंदननगर येथील शिवाजी पुतळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर नगर रस्त्यावरुन पुण्याच्या दिशेने ताफा मार्गस्थ झाला.
आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
रामवाडी चौकात ताफा आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला मुंबईला जायची अजिबात हौस नाही. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. आम्ही मुंबईला येणार नाही. परंतु, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार देखील नाही. कारण, खूप वर्षे झाली. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठा बांधव स्वस्थ बसणार नाही.