औरंगाबाद – किरीट सोमय्या यांनी आता शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याकडे मोर्चा वळवला असून त्यांच्यावर आरोप केले आहेत. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
शरद पवार म्हणाले अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. ही धमकी कुणाला देता, धमक्यांची सिरीज सुरु करा. 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत.
आज मी अर्जुन खोतकर यांचे नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन हा कारखान्याचा घोटाळा केला. कारखान्याची 100 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अर्जुन खोतकर यांची 100 कोटीचा कारखाना आणि 1 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपला धमकी देण्याचा उद्देश होता, असा आरोपही सोमय्या यांनी केला.