– मनीषा सुतार
मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई महानगर परिसरातील महिलांविरोधातील गत वर्षाच्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महिला आणि मुली यांच्या अपहरणाचे प्रकार गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी वाढल्याचे दिसत आहे. अल्पवयीन मुलींबाबतही गुन्ह्यांमध्ये यावर्षी वाढ झालेली दिसत आहे. दक्षिण मुंबईतील चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करून घडलेल्या हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. महिला आणि मुली आज महानगरांमध्ये सुरक्षित नाहीत, असेच दिसून येते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक आहे, तरीही गुन्हे का वाढत आहेत, हा कळीचा प्रश्न आहे. राज्य सरकारने राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच मुली व महिलांना बचावासाठी माहिती देणे व शारीरिक प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यापर्यंत 1977 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी याच काळात महिलांविरोधात घडलेल्या 2078 गुन्ह्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महिलांविरोधात घडलेल्या या गुन्ह्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. असे जरी असले तरी मुंबईत यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 325 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 207 गुन्ह्यांमधील तक्रारदार अल्पवयीन आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तुलनेने कमी म्हणजे 304 बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. म्हणजे या वर्षी बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. महिला व मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 407 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 357 गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचा अर्थ महिला व मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यांपर्यंत 713 गुन्ह्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी याच काळात विनयभंगाच्या 837 गुन्ह्यांची नोंद मुंबईत झाली होती.
म्हणजे विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईत “पोक्सो’ कायद्यांतर्गत 371 गुन्ह्यांची नोंद झाली होती. यंदा पोक्सो कायद्यांतर्गत 390 गुन्ह्यांची नोंद झालेली दिसून येत आहे. बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत 207 गुन्हे, विनयभंग व पोक्सो अंतर्गत 166 गुन्हे, छेडछाड व पोक्सो अंतर्गत सात व इतर भादंवि कलमांसह पोक्सो गुन्ह्यांअंतर्गत 10 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईतील गुन्ह्यांची स्थिती पाहता गंभीर आहेच, परंतु पोलीस विभागाने गुन्हे थांबविण्यासाठी राबविलेल्या कृती उपयोगी पडत नसल्याचे दिसत आहे किंवा योग्यरित्या काम सुरू नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील साकीनाका येथे सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना 10 सप्टेंबर 2021 मध्यरात्रीच्या सुमारास खैरानी मार्गावरील एस. जे. फिल्म स्टुडिओजवळ एक स्त्री आरोपीला भेटली. त्यांच्यात आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिला फरफटत एका टेम्पोजवळ नेले. टेम्पोत त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. तिला जखमी अवस्थेत तिथेच सोडून आरोपी तेथून पळून गेला. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. खैरानी मार्गावरील पुठ्ठ्याच्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून आरोपी एका स्त्रीला बेदम मारहाण करत असल्याची माहिती कळवली. त्याची दखल घेऊन नियंत्रण कक्षाने तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याकडे या घटनेबाबत कळवून तेथे जाण्यास सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एका टेम्पोत पीडिता बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र, दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली.
या क्रूर घटनेनंतर मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. मुंबई पोलिसांना मोबाइल डाटा टर्मिनल अंतर्गत पेट्रोलिंग गाडी आणि 500 टॅबलेट देण्यात आले. या यंत्रणेच्या माध्यमातून गस्त घालणाऱ्या गाडीचे लाइव्ह लोकेशन नियंत्रण कक्षाला प्राप्त होते. पारंपरिक पद्धतीने नियंत्रण कक्षाकडून माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी काही कालावधी लागायचा. तो या मोबाइल डाटा टर्मिनलमुळे कमी झाला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच संवेदनशीलता वाढवण्यासाठी टॅक्सी व रिक्षाचालकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. त्यात महिला प्रवाशांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काही महत्त्वपूर्ण उपाय खासगी टॅक्सी, काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील मुंबईतील चौपट्यांवर गस्त घालण्यासाठी पोलिसांना सॅगवे पुरण्यात आली आहेत. मरिन ड्राइव्ह, वरळी चौपाटीवर त्याद्वारे गस्त घालण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. पण त्यांचा वापर अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. कर्तव्य हे करायचे म्हणून नाही तर मनापासून केले पाहिजे तर त्यात यश येऊ शकते. पोलीस विभागाला अजूनही सतर्क राहून काम करावे लागेल.
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंड व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या आधारे पोलीस दलाचे अद्ययावतीकरण करण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात ट्रॅक मी ऍप्लिकेशन, राइड शेअरिंग ऍप्लिकेशन सारख्या विशेष ऍप्लिकेशनचा समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय मुंबईतील काळोख्या व निर्जनस्थळांची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली होती. अशा 160 ठिकाणांवरील सीसीटीव्हींची संख्या वाढण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. याशिवाय बलात्कार, ऍसिड हल्ला, लैंगिक अत्याचार अशा महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासाला तत्काळ गती मिळण्यासाठी मुंबई पोलिसांना अद्ययावत न्यायवैद्यक संच पुरवण्यात येणार होते. घटनास्थळी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी थ्रीडी स्कॅनर, जैविक पुरावे गोळा करण्याचे साहित्य, अंगुलीमुद्रा घेण्याचे साहित्य, बलात्कारासंबंधित गुन्ह्यांमध्ये आवश्यक पुरावे गोळा करण्याचे साहित्य यांचा समावेश होता. त्याशिवाय मुंबईतील सीसीटीव्हींची जाळे वाढवण्यात आले आहे. लवकरच त्यात आणखी सीसीटीव्हींची भर पडणार आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत तर पोलिसांनी कर्तव्याप्रती कार्यशक्ती, तपासासाठी इच्छाशक्ती वाढवणे गरजेचे आहे.