मुंबई – 2007च्या मुंबई मनपा निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिकेत शिवसेना जिंकणार की हारणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तेव्हा सर्व शिवसैनिकांमुळे ती निवडणूक जिंकली. त्यावेळी अशीच गर्दी आली होती. त्यावेळी काही महिलांना आनंदाने अश्रु आवरत नव्हते. तेव्हा लक्षात आले की महापालिका तर जिंकलो पण यांना काय देवू शकतो. त्यामुळे अश्रुचे मोल ज्याला कळते तोच खरा निष्ठावान आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली आमदार, खासदार आणि नगरसेवकांची गळती अद्याप थांबलेली नाही. शिवसेनेचे सायनचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला.या प्रवेशानंतर आज या मतदारसंघातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मिंधे आणि भाजपला सांगतो की तुम्ही दर आठवड्याला माझा एक-एक माणूस फोडत राहा. बिनकामाची माणसे तुम्ही घ्या, पण शिथीलता आलेले माझे शिवसैनिक ताजेतवाने होऊन पेटून उठत आहेत. त्यामुळे तुम्ही हे फोडाफोडीचे काम करा. ज्यामुळे शिवसेना जोमाने उभी राहत आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो, असेही ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.