बारामती – एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कोणत्याही वस्तूचं सोनं होत होतं, असं मी ऐकलं आहे. पण बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते, हे मी आता प्रत्यक्षात पाहिलं. भाजप आणि शिवसेनेत अंतर आले पाहिजे, असं शरद पवारांनी म्हंटले होते. त्यांना शिवसेनेला संपवायचं होतं, ते त्यांनी केलं. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नादाला लागलेल्यांची राख होते. आता शिवसेनेचं काय झालं ते आपल्या समोर आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकर बारामतीत बोलत होते.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावरून टीका करताना पडळकर म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित केले जाहिजे होते आणि त्यांना खंजीर हे चिन्ह द्यायला पाहिजे होते. ठाकरेंना आता मशाल चिन्ह जनतेत रुजवायला वेळ लागले. खंजीर म्हंटलं असतं तर लोकांच्या लगेच लक्षात राहिलं असतं. राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून शिवसेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असं पत्र मी निवडणूक आयोगाला लिहिणार मात्र ते खंजीर एकमेकांत खुपसू नका, असे पडळकर म्हणाले.
पडळकर पुढे म्हणाले की, आमचे दोन्ही नेते घरात बसणारे नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही राज्यभर दौरे केले. ते घरात बसणारे नसून फिल्डवर जाणारे आहेत. तुम्हाला जिथे जिथे अडचण येऊल तिथे सरकारकडून मदत होईल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.