नवी दिल्ली – चांद्रयान-3 लॅंडिंगच्या ऐतिहासिक यशानंतर आता त्याच्या राजकीय नफा-तोट्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे श्रेय भाजपने शास्त्रज्ञांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे देश आज या टप्प्यावर पोहोचला आहे.
चांद्रयान-3 ने हे यश अशा वेळी मिळवले जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जोहान्सबर्गमध्ये होते. भारताच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. इतर देशांचे नेते पंतप्रधानांचे अभिनंदन करत असतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने विरोधकांचे पित्त खवळले आहे. अशातच सप्टेंबरच्या सुरुवातीला दिल्लीत जी-20 शिखर परिषद होत आहे.
भाजपने गुरुवारी एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये सन 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या अपयशातून धडा घेत, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली चांद्रयान-3 चे यश मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी थेट बंगळुरूला पोहोचून इस्रोच्या शास्त्रज्ञांनाही भेटू शकतात.
या श्रेयवादामध्ये कॉंग्रेसही मागे नाही. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना पत्र लिहिले आहे. या अद्भुत कामगिरीबद्दल सोनियांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही गुरुवारी इस्रोमध्ये जाऊन शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे.
चांद्रयान-3 च्या लॅंडिंगनंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला यश का मिळाले, कसे मिळाले, याचे सर्व श्रेय हे आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना जाते. पण सरकारचा पाठिंबाही महत्त्वाचाच असतो. या मोहिमेसाठी सरकार संसाधने उपलब्ध करून देत असते, वैज्ञानिकांना प्रोत्साहन देते.
बुधवारीच कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका महान वैज्ञानिकाचा हवाला देत ट्विटरवर म्हटले की, या मिशनचा आम्हाला काय फायदा झाला ते सर्वांना सांगण्याचे कॉंग्रेसच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यांना या यशाचे सर्व श्रेय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना द्यायचे आहे.
एका ज्येष्ठ विश्लेषकाच्या मते, इस्रोच्या स्थापनेचे श्रेय नेहरूंना दिले जाते. “आर्यभट्ट’ आणि “भास्कर’चे श्रेय इंदिरा गांधींना जाते. अणुचाचणीचे श्रेय इंदिरा गांधींना आणि अटलबिहारी वाजपेयींना दिले जाते. त्याचप्रमाणे आज चांद्रयान-3 यशस्वी झाले तर त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना देण्यात चूक काय आहे? चांद्रयानचा इस्रो ते चंद्रापर्यंतचा प्रवास झाला तेव्हा श्रेय तिथल्या सर्व सरकारांना दिले जाते. चांद्रयान-3 च्या यशाचे श्रेय साहजिकच विद्यमान सरकारला द्यायला हवे.
कठोर परिश्रम, कष्ट, तपश्चर्या, चिंतन ही शास्त्रज्ञांची आहे. त्यांची हिम्मत वाढवणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी संसाधने उभारणे ही राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. लढत तर सैनिकच असतात; पण जिंकले-हरले तर नाव सेनापतीचेच होत असते. लोकसभा निवडणुकीत चांद्रयान-3 च्या यशाच्या मुद्द्यावर मतदान होणार का? तर साहजिकच सध्याचे सरकार ते हायलाइट करेल.