पुणे – राज्यात शासकीय किंवा खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा हवी ही महत्त्वाची अट असते. राज्य सरकारने त्याचा नव्याने विचार करण्याचे ठरवले आहे. राज्यात व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ही संकल्पना राबविण्याचा विचार असून, त्यात जागेची अट असणार नाही, त्यामुळे नव्या विद्यापीठांच्या स्थापनेचा मार्ग सुलभ होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
“पेरा’ (प्रिमीन्यंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेकडून व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल, डॉ. स्वाती मुजमदार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संदीप झा, डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. सायली गणकर, डॉ. प्रभात रंजन, डॉ. मनीमाला पुरी, डॉ. मिलिंद पांडे आदी उपस्थित होते.
ही त्यांनी सांगितले आहे.
उदय सामंत म्हणाले की, सरकार आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सर्व संस्था आणि खासगी विद्यापीठ यांच्यात सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. विद्यार्थी केंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांना कार्य करावे लागणार आहे. नवीन शिक्षण धोरण राबवित असताना खासगी विद्यापीठांच्या प्रतिनिधीची नियुक्ती संबंधीत समितीत करण्याचा शासनाचा मानस आहे. शासन नेहमीच खासगी विद्यापीठांशी संवाद ठेवून काम करेल.
सरकार आणि संघटनांनी हातात हात घालून काम करावे लागणार आहे. खासगी विद्यापीठांच्या अनेक अडचणी आहेत. मात्र, कोरोनाचे संकट असल्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही.
भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देत असताना संस्थाचालकांना चांगल्या वातावरणामध्ये संस्था चालवली पाहिजे. त्यालाच पूरक नियम आणि सरकारचे बंधन असले पाहिजे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
प्रास्ताविक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अशोक घुगे, प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी केले. आभार प्रा. डॉ. प्रभात रंजन यांनी मानले.