पुणे/कोंढवा – लॉकडाऊनमुळे आर्थिक परिणामांची झळ अद्यापही सामान्य माणसाला बसत असताना देशात आता आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला आहे. ही संकल्पना चांगली वाटत असली तरी सध्या, नोकरी, व्यावसाय, रोजगाराच्या अर्थचक्राने अद्यापही वेग घेतलेला नसल्याने हाताला काम नसल्याने मुजर वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पैसा आणायचा कुठून? असा सवाल मजूर अड्ड्यावरील कामगार आजही उपस्थित करीत आहेत.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात सर्व काही सुरू झालेले असले तरी अर्थचक्राला गती आलेली नाही. नोकरदार वर्ग सावरत असला तरी हातावर पोट असणाऱ्या कामगारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. रोजगार मिळेल या आशेने मजुर दररोज सकाळी येऊन थांबतात. उपनगर आणि परिसरातील मजुर अड्ड्यांवरील वाढणारी गर्दी अगदी दुपार होऊन गेल्यानंतरही कायम असते.
हडपसर, कात्रज, कोंढवा, वारजे-माळवाडी, धायरी, वाघोली, चंदननगर, येरवडा या ठिकाणी मजूरअड्डे आहेत. परराज्यातील मजुरांची संख्या आता पुन्हा मोठ्या प्रमाणत दिसू लागली आहे. बांधकाम, हॉटेल व्यवसाय अद्याप सुरळीत झालेला नाही. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी आहे. तर, घर कामगार महिला, नाका कामगार, स्वच्छतेची कामे करणारे यांची संख्या अधिक आहे. मात्र, या मजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ अनेक मजुरांवर आली आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यापासून दररोज काम शोधायला मजुर लोक बाहेर पडत आहेत. मात्र, काम नसल्याचे सांगितले जात असल्याने हा मजुर हताश झाला आहे.