पुणे – प्रामाणिकपणा व एकनिष्ठता ही वकिली व्यवसायाची मूल्य जोपासली पाहिजे. आपले जीवन मूल्यवर्धीत असले पाहिजे, असे प्रतिपादन राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात आयोजित केलेल्या अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या वेळी न्या. शिंदे बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव अॅड. भगवानराव साळुंखे, प्राचार्य डाॅ. शुभदा घोलप उपस्थित होत्या. शिंदे म्हणाले, अभिरूप न्यायालय हे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक चांगल व्यासपीठ असून, यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होण्यास मदत होते. कोणत्याही व्यवसायात आव्हान स्वीकारणे ही एक यशाची पायरी आहे.
अभिरूप न्यायालयात राज्यपाल महोदय यांची संविधानिक कर्तव्य व अधिकार या संबंधित त्यांनी घेतलेली भूमिकेवर विद्यार्थ्यांनी वाद विवाद व युक्तीवाद केला. स्पर्धेचे चषक व प्रथम पारितोषिक शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने पटकावला. लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाने दुसरे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट मेमोरिअल मुंबई विद्यापीठाच्या लॅा अकॅडमी तर स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून संध्या सोनवणे, एसएसएम संस्थेच्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनिने पटकावले. अभिरूप न्यायालय स्पर्धेत देशातील १६ विधी महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला. स्पर्धेचे संयोजन डाॅ. रवींद्र वाकडे व मनोजकुमार वानरे यांनी केले.