नगर – केडगाव, बागडपट्टी, नवी पेठ या आरोग्य केंद्रांचा अपवाद वगळता, इतर केंद्रांची अक्षरशः गोदामे झाली आहेत. इमारतींची दुरवस्था, आवश्यक साहित्याची कमतरता, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, अशा कारणांमुळे ही केंद्रे नावापुरतीच उरली आहेत. महापालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने शहरातील महापालिका आरोग्य केंद्रे रामभरोसे आहेत.
पाच लाख लोकसंख्या असलेल्या अहमदनगर शहरात महापालिकेची अवघी आठ आरोग्य केंद्रे आहेत.तीही नावालाच उभी आहेत. त्यातल्या चार केंद्रांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांनीदेखील या आरोग्य केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. महापालिका प्रशासनासह आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. हे अधिकारी केवळ नावाला आरोग्य अधिकारी आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली आहे.
माळीवाडा, भोसले आखाडा, मुकुंदनगर, झेंडीगेट, नवीपेठ, बागडपट्टी, नालेगाव, केडगाव या ठिकाणी महापालिकेची आरोग्य केंद्रे आहेत. रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देणे, तसेच शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रांकडे आहे. इमारतींची दुरवस्था, आवश्यक साहित्याची कमतरता, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, अशा कारणांमुळे ही केंद्रे नावापुरतीच उरली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य केंद्रांसाठी भरमसाट निधी येत असला, तरी त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्याचे, या आरोग्य केंद्रांची सद्यःस्थिती पाहून स्पष्ट होते.
प्राथमिक उपचार, लसीकरण, जंतुनाशक फवारणी मोहिम, गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप, क्षयरोग तपासणी, डेंगी, न्यूमोनिया यांसारखे आजार रोखण्यासाठी जनजागृती आदी कामे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडून प्रभावीपणे होत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग पसरू नये म्हणून फवारणी होणे आवश्यक आहे. तर याकडे कोणी लक्ष देत नाही.
सावेडी उपनगरात आरोग्य केंद्र कधी होणार
सावेडी उपनगर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सावेडीकरांनी अनेक वर्षांपासून आहे. पण येथील नगरसेवकांचे लक्ष नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. मात्र त्या तुलनेत या पसिरात आरोग्य सेवा देण्यास महापालिका कमी पडत आहे. लोकसंख्येचा विचार करून आरोग्य केंद्र वाढविण्याची गरज आहे. पण त्याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनला काही देणेघेणे नाही, असे वागत आहेत.