पुणे -मागील वर्षभरापासून महापालिकांच्या निवडणुका रखडल्याने पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर प्रशासक आहेत. त्यामुळे कामांना मर्यादा येत आहेत. लोकप्रतिनिधीअभावी विकास कामे थांबल्यामुळे शहरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नांच्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात आले. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी जुन्या वाड्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यास गती मिळणार आहे. अधिवेशानात भिडेवाडा, मेट्रो आणि अष्टविनायक संदर्भात चर्चा झाली असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पंढरपुरातील पुरातन वाडे, वास्तूंना बाधा न पोहचविता विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत सोलापूर प्रशासनला निर्देश देण्यात आले आहेत. कर्नाटकातील सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटक सरकारने निधी देण्यापासून रोखले. त्याचा निषेध म्हणून विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. तसेच प्रसूतीसाठी महिला आमदारांनाही तीन महिन्यांची रजा मिळण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यात उभारल्या जाणाऱ्या साहित्यिक, प्रकाशक आणि रसिकांसाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनांवर कारवाई करण्यात येणार आहे. देशाचे आकर्षण ठरेल, असे “मराठी भाषा भवन’ मुंबईत उभे करण्याची सूचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. ही सूचना भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केली असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आदिवासी विकास, हिरकणी कक्ष, शैक्षणिक आणि सामाजिक विषय सोडविण्यासाठी सभागृहात चर्चा झाल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
शेतीच्या पंचनाम्यासाठी पाठपुरावा
अवकाळी पाऊस आणि गीरपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे वेळेत न झाल्यास आणि तशी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यास संबंधित विभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना वेळेत पंचनामे करण्याची सूचना केली जाणार आहे. तसेच त्यासाठी पाठपुरावाही केला जाणार आहे. कारण शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाल्याने त्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
=