राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला आज अचानक जाग आली. नवीपेठ कार्यालयीन इमारत, शनी मंदिर, शिवाजी चौक, नवी पेठ,आडवीपेठ यातील अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली. साठपेक्षाही अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच अतिक्रमणधारकांना समक्ष भेटून अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य अतिक्रमण धारकांनी आज त्यांची दुकाने रस्त्यावर नेहमीप्रमाणे लावलेली नव्हती. या सूचनांकडे दुर्लक्ष करूनही ज्यांनी त्यांच्या हातगाड्या रस्त्यावर आणल्या, त्या अतिक्रमण विरोधी पालिकेच्या विभागाने जप्त केल्या.
एकूण पाच ते दहा टपऱ्या हातगाड्या पालिकेने जप्त केल्या .कार्यालयीन इमारतीच्या जवळपास वडापाव वाल्यांच्या गाड्यांचा विळखा होता.आज त्यांनी स्वतःहून त्यांच्या हातगाड्या लावल्या नाहीत. शनी मंदिर परिसरातील अतिक्रमणा हटवण्यात आली. त्यानंतर पृथ्वी कॉर्नरवरील सर्व अतिक्रमण हटवून आज रस्ता पूर्णपणे मोकळा केला गेला. कितीतरी महिन्यांनी रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला.
नव्या पेठेतील ,आडव्या पेठेतील ही अतिक्रमण हटवण्यात आली. अतिक्रमणे पूर्ववत होवू नयेत म्हणून काही भागांमध्ये जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणातील ओटे काढून टाकण्यात आले.आजच्या कारवाईसाठी खास पोलीस बंदोबस्त ही मागवण्यात आला होता.
गुरुवारच्या विश्रांतीनंतर पुन्हा शुक्रवारी अतिक्रमण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कार्यालयीन अधीक्षक विकास घटकांबळे यांनी सांगितले. मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व 30 पेक्षा ही अधिक कर्मचारी या मोहीमेत सहभागी झाले होते .जेसीबी व क्रेनच्या साह्याने टपऱ्या हलविण्यात आल्या.यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. काहींनी पथकातील कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली.