नवी दिल्ली – बीरभूम हिंसाचारानंतर पोलिसांच्या छापेमारीमध्ये गेल्या २४ तासांत बंगालमधील विविध ठिकाणांहून 350 हून अधिक क्रूड बॉम्ब सापडले आहेत. यापैकी बहुतेक 200 बॉम्ब बीरभूमच्या मारग्राम भागात सापडले आहेत. पोलिसांनी या छाप्यात क्रूड बॉम्बसह 11 जणांना पकडले आहे.
मारग्राम परिसरात शनिवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये 4 बादल्यांमध्ये ठेवलेले 200 बॉम्ब जप्त करण्यात आले. मारग्राम ते हिंसाचारग्रस्त बागतुई गावाचे अंतर सुमारे ४० किमी आहे. जिल्ह्य़ाचे एसपी नागेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, क्रूड बॉम्बच्या जप्तीसाठी सातत्याने छापे टाकले जात आहेत.
बीरभूम हिंसाचारानंतर, ममता बॅनर्जी यांनी प्रभारी डीजीपी मनोज मालवीय यांना राज्यातील सर्व अवैध बॉम्ब आणि शस्त्रे जप्त करण्याचे निर्देश दिले होते. ममता यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बॅरकपूर-बिजपूर विभागात टीम अधिक सक्रिय करण्यात आली आहे. ही मोहीम 10 दिवस चालणार आहे.