कोलकाता – बीरभूम हिंसाचारानंतर राजकारण तापले आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बीरभूम हिंसाचार पीडितांची भेट घेतली. त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच पीडितांसाठी घोषणाही केली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. अशी घटना घडेल असे वाटले नव्हते. पोलिस वेळेवर का पोहोचले नाहीत, याचा तपास केला जाईल. हत्येनंतरही पोलीस सतर्क नव्हते. काही लोकांमुळे ही घटना घडली आहे. या घटनेशी संबंधीतांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी सक्रियपणे काम करावे. सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून आणावे. पोलिसांनी जबाबदारी ओळखली असती तर अशी घटना घडली नसती. अशी घटना घडणार होती, हे IC आणि SDPO ला माहीत होते, तरीही हे लोक सावध झाले नाहीत.
यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि घर बांधण्यासाठी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 10 पीडित कुटुंबांना नोकरीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने स्थापन केली चौकशी समिती –
रामपुरहाट भागात टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर हिंसाचारात ८ जणांना जिवंत जाळल्याच्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून ती चौकशी करून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे भाजप बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार आहे.