नवी दिल्ली – पोटनिवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा करत कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी अहंकार सोडावा आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी कॉंग्रेसने केली.
पोटनिवडणुकांच्या निकालाचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणुकांत लोकसभेच्या तीन पैकी दोन जागांवर भाजपचा पराभव झाला. विधानसभा पोटनिवडणुकांत कॉंग्रेसशी थेट लढत असणाऱ्या बहुतांश जागा भाजपने गमावल्या.
हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निकालांवरून ते सिद्ध होते. मोदींनी राजहट्ट सोडून कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच, इंधन दरवाढीतून होणारी लूट थांबवावी, असे त्यांनी म्हटले. हिमाचलमधील पोटनिवडणुकांत कॉंग्रेसने निर्विवाद यश संपादन केले. त्या राज्याच्या सत्तेवरून भाजप जाणे निश्चित आहे, असे भाकितही सुर्जेवाला यांनी केले.