– माधव विद्वांस
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक, कादंबरीकर, लघुनिबंधकार आणि समीक्षक पद्मभूषण वि. स. तथा भाऊ खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे वडील सांगली संस्थानात मुन्सफ होते. ते 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली. त्यांचे चुलत चुलते सखाराम रामचंद्र खांडेकरांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव विष्णू सखाराम खांडेकर असे झाले.
त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्टसपर्यंत झाले. वर्ष 1913 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांना राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी परिचय झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांमधील साहित्यिक ओळखला होता. त्यांनी खांडेकरांना लेखनास प्रवृत्त केले व त्यांच्यातील लेखक जागा झाला. त्यांनी वर्ष 1930 मध्ये “हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम, उल्का, पांढरे ढग, सुखाचा शोध, जळलेला मोहर, क्रौंचवध, अश्रु, ययाति, अमृतवेल, सोनेरी स्वप्ने भंगलेली अशा त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.
रवींद्रनाथ टागोर व खलील जिब्रान यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सुमारे 150 हून अधिक रूपककथा त्यांनी लिहिल्या आहेत. भाऊंच्या कथा, कादंबऱ्यांचे अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांना गुजराथी, हिंदी, तमिळ भाषांतही फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. भाऊंनी पुराणातील ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा या त्रिकोणी व्यक्तिरेखांचे संघर्षमय कथानक “ययाती’ या कादंबरीतून सुंदरपणे मांडले. “ययाती’ कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
1920 मध्ये ते शिरोड्याच्या ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक झाले. 1938 मध्ये ते शाळेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे वास्तव्य केले व लेखन हाच व्यवसाय ठेवला. त्यांच्या कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्तीला अलंकारिक आणि भावनिक शब्दांची जोड मिळाल्याने त्यांचे लेखन वाचकांना भावले. त्यांनी सुमारे 35 कथासंग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख लिहिले.
छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या काही कथा-कादंबऱ्यांवर चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकाही तयार झाल्या आहेत. वर्ष 1936 मध्ये छाया चित्रपट मराठीत, वर्ष 1938 मधे ज्वाला हा हिंदी आणि मराठीतून चित्रपट तयार झाला. त्यानंतर वर्ष 1941 मध्ये अमृत चित्रपट हिंदी आणि मराठीतून तयार झाला. धर्मपत्नी हा चित्रपट त्याच वर्षी तामीळ आणि तेलगूमध्ये तयार झाला. परदेशी, देवता हे चित्रपट त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर तयार झाले आहेत. “लग्न पहावे करून’ या चित्रपटाचे संवाद आणि पटकथाही त्यांनी लिहिली. 2 सप्टेंबर 1976 रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.