नागपूर – सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण दिले नाही. सरकार आपल्या शब्दावर ठाम आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या हाती काहीच लागले नाही, असा दावा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केला आहे.
राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांचे समाधान केले आहे. मी सरकारचे अभिनंदन करतो. सरकारने यासंबंधी जे राजपत्र काढले आहे त्यात नवे काहीच नाही. त्यातील सर्वच नियम जुने आहेत. त्यामुळे ओबीसींवर कोणताही आघात झाला नाही किंवा त्यांच्या आरक्षणाला कोणता धक्काही लागला नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
ओबीसींनी या विषयी आपल्या मनात कोणताही गैरसमज ठेवू नये. सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाळला. आता मुंबईकडे कूच करण्याची काहीच गरज नाही. आमच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही. सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रही दिले नाही, असे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.
वंशावळ तहसीलदारांना माहिती नसते
लोकांची वंशावळ शोधण्यासाठी तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली होती. पण वंशावळ ही आपल्यालाच तयार करावी लागते. ते काम तहसीलदार करत नाहीत. तुमची वंशावळ तहसीलदारांना माहिती नसते. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसला नाही हे स्पष्ट आहे, असे तायवाडे म्हणाले.
५७ लाखांपैकी ९९.५ टक्के सर्टिफिकेट जुनी
मराठा समाजाच्या तब्बल ३७ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही. ज्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे, त्यालाच ते नोंदी म्हणत आहेत. १९९४ पासून आतापर्यंत सापडलेल्या ५७ लाखांपैकी ९९.५ टक्के सर्टिफिकेट जुने आहेत. त्यामुळे ओबीसींना धक्का बसला नाही, ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही आणि ओबीसींचे नुकसानही होणार नाही, या माझ्या दाव्यावर मी आजही ठाम आहे, असेही तायवाडे यावेळी जोर देत म्हणाले.