पुणे – भारतीय रग्बी संघटना (रग्बी इंडिया), भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना आणि मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी मालिका कायम ठेवत विजेतेपद संपादन केले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 31-10 असा पराभव करून करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून सोमनाथ जाधव (11गोल), सुरेंद्र कासूरे(7गोल), ऍग्नेल नायडू(9गोल), अँथोनी जॉन(4गोल) यांनी गोल केले.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऍग्नेल नायडू(11गोल), सोमनाथ जाधव(8गोल), सुरेंद्र कासुरे( 3गोल) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने बिहार संघाचा 22-13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात कर्नाटक संघाने हरियाणा संघाचा 9-7 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत बिहार संघाने हरियाणा संघाचा 13-5 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
बिहार संघाकडून दीपक शर्मा (3गोल), दीपक कुमार सिंग (3गोल), शैलेश कुमार (3गोल) आणि राजीव कुमार (4गोल) यांनी गोल केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रग्बी इंडियाचे सीईओ अंकुश अरोरा आणि भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी कुमार यांच्या हस्ते
करण्यात आले.