पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरण सध्या वीजबिलांची वसुली मोहीम राबवित आहे. यात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कामात कर्मचाऱ्यांना शिविगाळ, मारहाण, धक्काबुक्की होत आहे. त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस विभागाचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करण्याचे पुणे व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी ६ आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण १३ प्रकार घडले आहे. या प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच आरोपींच्या अटकेची देखील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे महावितरणने सांगितले. वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे. महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीजबिल नियमित भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे, असे महावितरण कंपनीने म्हटले आहे.