नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळण्याचे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावर मोदींना स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. पण, वास्तव वेगळे आहे, असा पलटवार विरोधकांनी केला.
आलंकारिक भाषेत मोदींनी मोठ-मोठे दावे केले. त्यातून त्यांनाच विजयाबद्दल खात्री नसल्याचे सूचित होते. मोदींचे सरकार आश्वासने विसरले. त्या सरकारने देशाला केवळ नुकसान पोहचवले. जनता त्यावर निकाल देईल. इंडिया ही विरोधकांची आघाडी ४०० जागा जिंकून केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास भाकपचे नेते बिनॉय विश्वम यांनी व्यक्त केला.
आपल्या देशात सर्वांनाच स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. पण, देशातील जनता कुणाच्या स्वप्नावर न चालता स्वत:हून निर्णय घेईल, असे माकपचे नेते जॉन ब्रिटास यांनी म्हटले. भाजप ३७० जागा जिंकेल, असे मोदींनी म्हटले. तो आकडा गाठला नाही तर मोदी शपथ घेणार नाहीत का? अशाप्रकारच्या भाजपच्या स्वप्नाचा नेहमीच भंग झाला आहे.
मोदींचे स्वप्न म्हणजे इंडिया शायनिंगचा दुसरा भाग ठरेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते मणिकम टागोर यांनी दिली. भाजपने २००४ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी इंडिया शायनिंगची घोषणा दिली होती.