नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर तपास संस्था सक्रिय झाल्या असून पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याच्या अगोदरच कोट्यवधी रूपयांची रोकड आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले आहेत. १९ एप्रिलला १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वीच विविध राज्यांतून ४६५० कोटी रूपयांची विक्रमी जप्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दोनच दिवसांपूर्वी दिली आहे. (Lok Sabha Election: 4650 crore seized before the first phase)
२०१९ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ३४७५ कोटींपेक्षा अधिकची जप्ती करण्यात आली होती. यावेळी पहिल्या टप्प्यातील मतदानही अद्याप झाले नसून त्याच्या अगोदरच मागच्या वेळेपेक्षाही अधिकची संपत्ती जप्त केली गेली आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५१ कोटी रूपयांची दारू आणि ४५.५९ कोटींची रोकड जप्त केली आहे. १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कर्नाटकात जप्तीशी संबंधित १६५० एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. येथे एकूण ३४५.८९ कोटींची जप्ती झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ९.९३ कोटींचे अमली पदार्थ, ५६.८६ कोटींचे सोने, ५६ कोटींची मतदारांना वाटण्यासाठी आणलेली विविध सामग्री याशिवाय ७.७३ कोटी रूपयांच्या अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या.