पुणे -प्रतिकूल परिस्थिती अन् शिक्षण पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा..अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद…पालकांकडून कृतज्ञतेची भावना…दिग्गज वक्त्यांनी दिलेला “घेत चला, देत चला अन् चांगला माणूस बना’ असा मार्गदर्शनपर सल्ला….अशा उत्साही वातावरणात सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे कायम ठेवणाऱ्या दैनिक “प्रभात’चा शिष्यवृत्ती सोहळा शनिवारी भारावलेल्या वातावरणात पार पडला.
सकाळचे प्रसन्न वातावरण.. त्यात पावसाचा शिडकावा आणि शिष्यवृत्ती सोहळ्यास विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांच्या मनमोकळ्या मनोगतास प्रमुख पाहुण्यांकडून तितकीच दाद मिळाली. एकीकडे मान्यवरांकडून कौतुकाची थाप आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांची कृतज्ञतेची भावना यातून कार्यक्रमाची उंची उत्तरोत्तर वाढत गेली.
प्रारंभी कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी दैनिक ‘प्रभात’चे संस्थापक वा. रा. कोठारी यांच्यापासून ते विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांना विद्यार्थ्यांप्रती असलेली सामाजिक संवेदना उदाहरणासह सांगत कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात केली. त्यानंतर सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी गेल्या १२ वर्षांपासून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “प्रभात’ कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण देत आनंद गांधी यांची शिक्षणाप्रती असलेली कळकळ आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना नेमक्या शब्दांत पोहोचवली.
सी.ए. मिलिंद काळे आणि अमित मोडक यांनीही स्वत:च्या जीवनातील प्रतिकूल परिस्थिती असतानाही कशी प्रगती केली, याचे स्वानुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. “कोणतेही काम कमी लेखू नका, आर्थिक मदत घेऊन स्वत: मोठे व्हा आणि इतरांना मोठे करा. शिक्षण पूर्ण झाले म्हणजे यश नव्हे, तर त्याला व्यावहारिक समजही तितकीच महत्त्वाची आहे,’ असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी काळे आणि मोडक यांच्या भाषणाने प्रेरित होऊन आयुष्यात मोठे शिखर गाठण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाची क्षणचित्रे…
- राज्यभरातून आलेले विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव
- शिक्षणासाठी मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले “प्रभात’चे ऋण
- वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुणवंत विद्यार्थी-पालकांना मिळाली पुढील दिशा
- ‘प्रभात’ने सुरू केलेला सामाजिक कार्याचा वसा आणखी पुढे नेण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प
- शिक्षण पूर्ण करून समाजाभिमुख नागरिक होण्याचा वक्त्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
- गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपक्रमाचे मान्यवरांनीही केले कौतुक
- संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी
- शिष्यवृत्ती उपक्रमांतून दिले जातेय पाठबळ
- शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना उपस्थितांकडूनही मिळाली दाद ‘प्रभात’ आणि विद्यार्थी
यांच्यातील ऋणानुबंध आणखी घट्ट
शिष्यवृत्ती उपक्रमामागील “प्रभात’चा उद्देश
- केवळ पैशांच्या अभावी गुणी विद्यार्थी
- शिक्षण मिळवण्यात मागे पडू नयेत
- योग्य पाठबळ आणि संधी दिल्यास समाजात हेच विद्यार्थी सकारात्मक बदल घडवून आणतील
- समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि
- ‘प्रभात’ परिवाराची समाजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असण्याची परंपरा
“दैनिक ‘प्रभात’ने शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल आभार. आयुष्यात दैनिक “प्रभात’च्या मदतीची जाणीव कायम राहील. भविष्यात मोठा टप्पा गाठल्यानंतरदेखील हा मदतीचा हात अन्य विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कार्यरत राहणार आहे.” – त्रिशरण कांबळे, बी.ए. प्रथम वर्ष, फर्गसन महाविद्यालय, मूळ नांदेड
“दैनिक “प्रभात’ने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला शिष्यवृत्ती दिली, हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. भविष्यात नक्की अधिकारी बनून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न राहील.” – श्रेया आखाडे, एल.एल.बी. विद्यार्थी
“आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबलेल्या विद्यार्थ्यांना दैनिक “प्रभात’ने मदतीचा हात दिला. त्यामुळे आम्ही कायमच “प्रभात’चे ऋणी आहोत. भविष्यात समाजासाठी मदत करण्याची प्रेरणा आम्हाला या उपक्रमातून मिळाली आहे.” – रविना जगताप, अभियांत्रिकी विद्यार्थिनी, इंदापूर
“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दैनिक प्रभात आणि दिशा परिवार या दोन्ही संस्थांचे भरीव योगदान आहे. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न या संस्थांनी केला आहे. भविष्यात न्यायाधीश बनण्याचे ध्येय ठरविले असून, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न असेल. “प्रभात’च्या या उपक्रमातून आम्हाला शिक्षण आणि समाजसेवेचीही प्रेरणा मिळत आहे.” – ओंकार गुराळे, एल.एल.बी. विद्यार्थी