नगर – कोण म्हणते देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाही.. अशा घोषणा देत महापालिका कामगार व कर्मचाऱ्यांचा 16 दिवसांचा लॉंगमार्च उद्या (सोमवारी) मुंबईच्या दिशेने सकाळी दहा वाजता प्रस्थान करणार आहे. 1 हजार 238 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 100 कर्मचारी या लॉंगमार्चमध्ये सहभागी होणार असून त्यांनी सोळा दिवसांच्या सामूहिक रजेचा अर्ज कामगार संघटनेकडे जमा केला असून त्यांच्याकडून तो महापालिका प्रशासनाकडे जाणार आहे. त्यामुळे तब्बल 16 दिवस महापालिकेचे कामकाज ठप्प होणार आहे.
सातवा वेतन आयोग मिळावा, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळावी या दोन मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेने नगर ते मुंबई मंत्रालय लॉंगमार्च आयोजन केले आहे. या आंदोलनात अग्निशामक दल, पाणीपुरवठा व वैद्यकीय सेवा या अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी तसेच मानधनावर व कंत्राटी असलेले कामगार-कर्मचारी वगळून अन्य सर्व विभागातील मिळून 1238 कर्मचारी आहेत. विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी, शाखा अभियंते, झाडू कामगार, केयर टेकर, शिपाई, हवालदार व अन्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.
कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदा वायकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता लालटाकी जवळील अण्णाभाऊ साठे पुतळा व लहुजी वस्ताद पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. तेथून हा लॉंगमार्च दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, चितळे रोड, तेली खुंट, कापड बाजार, माणिक चौक मार्गे माळीवाड्यात येणार आहे. तेथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यावर मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. तेथून इम्पिरियल चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर वाडिया पार्क क्रीडा संकुलातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यास वंदन करून हा लॉंग मार्च अमरधाम रोडने नेप्ती नाका चौकातून कल्याणच्या दिशेने जाणार जाणार आहे.
नगरहून मुंबईचे अंतर तीनशे किलोमीटरवर आहे. 16 दिवसात ते पायी पार करायचे असल्याने रोज किमान 20 किलोमीटर लॉंग मार्चची पदयात्रा होणार आहे. रस्त्यातील मोठ्या गावांतील मंदिरे व मंगल कार्यालयातून मुक्कामाची सोय केली गेली आहे. या लॉंगमार्च समवेत तीन ट्रक आहेत. त्यापैकी एकामध्ये स्वयंपाकसाठी किराणा साहित्य, पीठ व धान्य तर अन्य दोन ट्रक कर्मचाऱ्यांच्या बॅगा ठेवण्यासाठी आहे. याशिवाय एक रुग्णवाहिका व त्यामध्ये डॉक्टर आणि नर्स, विविध प्रकारचे औषधे व औषधोपचार सुविधा आहे. पिण्याच्या पाण्याच्या टॅंकर असणार आहे. सहभागी कर्मचाऱ्यांना चहापाणी, नाश्ता, दोन वेळेचे जेवण दिले जाणार आहे.प्रत्येकाच्या हातामध्ये मागण्यांचे फलक व झेंडे असणार आहेत.
राज्यभरातून प्रतिसाद
सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळावी, या मागणीस राज्यभरातील महापालिकांचा कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, धुळे, जळगाव, सोलापूर, नांदेड, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबई कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच नगर जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा नगरपालिकांचे कर्मचारीही यात सहभागी होणार आहेत.
तर लाथाबुक्क्याने तुडवणार
लॉगमार्चमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला गरज भासेल तसे चहापाणी, कॉफी, नाश्ता, दूध दिले जाणार आहे, पण कोणालाही दारू मिळणार नाही. ज्याने दारू मागितली वा रस्त्यात कुठून घेऊन तिचे सेवन करून लॉंगमार्चमध्ये आला तर आधी त्याच्या कमरेत लाथ घातली जाणार आहे व नंतर त्याला लाथाबुक्क्याने तुडवून घरी पाठवले जाणार आहे. विशेष म्हणजे असा स्पष्ट ठराव मनपा कामगार संघटनेने नियोजन बैठकीत केला आहे.
नगरमधून तिसरी पदयात्रा
महापालिका कामगारांची नगर ते मुंबई अशी आज सोमवारी निघणारी पदयात्रा तिसरी पदयात्रा आहे. याआधी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्याची साकळाई पाणी योजना मंजूर व्हावी म्हणून मुंबईपर्यंत पदयात्रा नेण्यात आली होती. त्यावेळी त्यात सुमारे साडेतीनशे जण सहभागी झाले होते. त्यानंतर गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यावर उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी प्रा.गाडे यांच्या नेतृत्वाखालीच ठाकरे समर्थकांची नगर-मुंबई पर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. आता महापालिका कामगारांची निघणारी पदयात्रा.