आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी। सकाळा सांगावी विनंती माझी।। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंगा बोलावितो।। अंतःकाळी विठू आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।
रामकुमार आगरवाल
देहूगाव, दि. 20 -जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा फाल्गुन वद्य द्वितीया 374 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज उत्सव साजरा झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त रविवारी (दि. 20) रणरणत्या उन्हात श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या समोर व भक्तनिवासाच्या आवारात दुपारी बारा वाजता या भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर मनोभावे बुक्का व तुळशी पानफुले उधळण केली. हा अनुपम्य सोहळा याचि देही याची डोळा पहायला मिळाल्याने आपले जीवन धन्य झाल्याची भावना मनोमन ठेवत वारकरी माघारी फिरले.
गेली दोन वर्षांपासून सुरू असलेल्या करोना महामारी संकटामुळे गतवर्षी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बीज सोहळा पार पडला होता. करोनाचे नियम शिथिल झाल्याने यंदा भाविकांनी देहूत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोष सुरू होता. बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच पांडुरंगाच्या
व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री व पहाटे हवेत गारवा असला तरीही सकाळी दहा वाजल्यानंतर मात्र उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवू लागला होता. अशा उन्हातही भाविकांच्या मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर दिसत होते.
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. श्रीं ची आरती, श्री विठ्ठल-रुक्मिणी, शिळा मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा, वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व विश्वस्त संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्यात, भजनी मंडपात, मंदिर परिसरात प्रवेशद्वारात, गोपाळपुरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर तसेच नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट व महाराजांचे वैकुंठ गमन तसेच संत तुकाराम महाराज यांची फुलांमध्ये प्रतिमा रेखाटली होती.
या अभंगाचे गायन करीत उपस्थित भाविकांनी श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली. त्या वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. हा बीजोत्सव सोहळा पार पडल्यानंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा दुपारी दीड वाजताच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालून संपन्न झाला. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात परंपरेप्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. दुपारी साडे बारा वाजल्यानंतर पालखी वैकुंठगमन मंदिरामधून पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली. सायंकाळी मुख्य मंदिरात कीर्तन झाले.
तुकाराम तुकाराम नामघोषात पुष्पवृष्टी
साडे अकरा वाजताच्या सुमारास पालखी वैकुंठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या वृक्षाखाली आली. त्याठिकाणी बापूसाहेब महाराज मोरे (देहूकर) यांचे परंपरेनुसार सकाळी दहाच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन प्रकरणातील घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती। मुक्त आत्मस्थिती सांडविन।। या अभंगावर कीर्तन सुरू होते. कीर्तनातून श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन प्रसंगाचे निरूपन करताना ते म्हणाले, संत आणि देव यांच्या अवतार घेण्याचे प्रयोजन, संत येतात कोठून, कशासाठी येतात, कोठे येतात व काय कार्य करतात याचे विवेचन केले.
कीर्तन व हरिनामाने शरीरदेखील ब्रह्मरूप होते अशा अनेक विषयांवर कीर्तनातून दाखले दिले. श्री संत तुकाराम महारांजानी हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून व योग साधनेच्या सहाय्याने त्यांनी आपली काया ब्रह्मरूप कशी केली, हे सांगितले. दुपारी बारा वाजता “पुंडलिका वरदा हरि विठ्ठल’, असा नामघोष व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्याक्षणी उपस्थित भाविकांनी आपले दोन्ही हात जोडून दृष्टीसमोर महाराजांचे सदेह वैकुंठगमन प्रंसगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.