नवी दिल्ली – प. बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून म्हणजे दोन मे नंतर पेट्रोलच्या दरात 21 वेळा वाढ झाली आहे. त्या निषेधार्थ डाव्या पक्षांच्या वतीने 16 ते 30 जून दरम्यान देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे देवव्रत विश्वास, मार्क्स लेनीनवादी कम्युनिस्ट पक्षाचे दीपंकर भट्टाचार्य आणि रिव्हॉल्युशनरी सोशॅलिस्ट पक्षाचे मनोज भट्टाचार्य यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या निवेदनात या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
इंधन दरवाढी मुळे घाऊक निर्देशांक 11 वर्षातील सर्वात अधिक झाला आहे. अन्नधान्याची किंमतीत एप्रिल महिन्यात पाच टक्के वाढ झाली आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत 10.16 टक्के वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंच्या किंमतीत नऊ टक्क्यांनी वाढ झाली असल्याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
कॉंग्रेसनेही यापुर्वी इंधनदरवाढीविरोधात देशव्यापी निदर्शने केली होती. डाव्या पक्षांनी म्हटले आहे की, देश मंदीच्या खोल खाईत लोटला गेला आहे. साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांची देशात चलती सुरू आहे. त्यांच्यावर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. लोकांना जगवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा काळाबाजार मोडून काढण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेद्वारा दीपावलीपर्यंत पाच किलो धान्य मोफत देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. सर्व व्यक्तींना 10 किलो धान्य, डाळी, खाद्यतेल, चहा साखर, मसाले इत्यादी असणारी पाकिटे त्यांना द्यावीत, असेही या पक्षांनी सुचवले आहे.
खात्यात साडेसात हजार भरा
प्राप्तकिर न भरणाऱ्या वर्गातील नागरिकांच्या खात्यात साडे सात हजार रुपये केंद्र सरकारने भरण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.