नवी दिल्ली: लॉकडाऊननंतर आता देशांतर्गत विमान वाहतुकीने चांगला वेग पकडला असून रविवारी देशाच्या विविध विमानतळांवरून एकूण 501 विमानांचे उड्डाण झाले आणि त्यातून 44 हजार 593 प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचवण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
25 मे पासून ही वाहतूक सुरू झाली असून आतापर्यंत 3370 विमान उड्डाणे करण्यात आली आहेत. लॉकडाऊनपूर्वी देशात एकूण 3000 विमानांचे उड्डाण रोज होत असे. त्या प्रमाणात अजून ही देशांतर्गत विमानसेवा पूर्ववत झालेली नसली तरी येत्या काही दिवसांत ती पूर्वीइतकीच करण्याचा प्रयत्न नागरी विमान वाहतूक खात्यामार्फत सुरू आहे.
काही राज्यांनी अजून पूर्वीइतकी विमान सेवा सुरू करण्यास अनुमती दिलेली नाही. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशात मंगळवारपासून आणि पश्चिम बंगालमध्ये गुरूवारपासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे.