रांची- राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ते तुरूंगातच असून सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना झारखंडच्या रांची येथील रिम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. येथील संचालकांच्या बंगल्यावर त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे व तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या सुवधेचा लालू गैरफायदा घेत असून त्यांनी येथूनच बिहारमधील राजकारणाची सूत्रे हलविण्यास सुरूवात केली आहे.
ते इच्छूक उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असून बैठकांचे सत्रही येथे सुरू झाले आहे. येथल्या तुरूंग महानिरिक्षकांनी वरिष्ठांना तसे पत्र पाठवल्यामुळे आता हा राजकीय मुद्दा बनला आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने लगेचच हा मुद्दा उचलून धरत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे.
जनता दलाचे प्रवक्ते नीरज सिंह यांनी हेमंत सोरेन यांना उद्देशून ट्वीट करताना त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हेमंत सोरेन कैदी नंबर 3351 (लालू यादव) यांच्या कारवायांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचेच अधिकारी त्यांना आरसा दाखविण्याचे काम करत असल्याचे नीरज यांनी महानिरिक्षकांच्या पत्राच्या संदर्भाने म्हटले आहे.
लालूंना शिक्षा झाली असून त्यांच्याबाबत योग्य न्याय करत त्यांना त्यांच्या योग्य जागी पाठवले जावे असेही त्यांनी म्हटले आहे.
शिक्षा भोगत असलेले लालू सुवधांच्या नावाखाली बंगल्यात राहत असून तेथे ते इच्छूक उमेदवारांचे बायोडाटा गोळा करत आहेत. लालू हेच आपले तिकीट फायनल करणार याची उमेदवारांनाही खात्री असल्यामुळे त्यांनी लालूंना भेटण्याचे सत्र अवलंबले आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अनेक नेते आणि पदाधिकारी सध्या बिहार ते झारखंड प्रवास करताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण मात्र पुन्हा एकदा तापले आहे.