पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षपूर्तीनिमित्त कवी आणि लेखक अहमद शेख यांनी कडव्यांच्या माध्यमातून महाकाव्य रचले आहे. याचे प्रकाशन पुण्यातील भाविसा भवन येथे झाले. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव हे उपस्थित होते.
आंबेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे महाकाव्य रवींद्र घाटपांडे यांच्या स्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सामान्यातील सामान्य लोकांना जोडून घेतले. त्यांची फौज उभी केली आणि अशा सामान्यातील अतिसामान्य लोकांमधूनच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारलेही.
जसा आपण रामराज्याचा उल्लेख करतो, तशा प्रकारचे नजीकचे रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होय. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. अहमदने आपल्या लेखनीतून ते कार्य केले आहे, त्यामुळे ते अभिनंदनीय असे राष्ट्रीय कार्य आहे, असे आंबेकर म्हणाले.