Junnar News: बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न? जुन्नरच्या गल्लीबोळांत रस्त्यांची दैना; नागरिक संतापले
Junnar News: जुन्नर शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी.

Junnar News – सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असतानाही जुन्नर शहरातील बहुतांश भागांतील रस्त्यांवर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या मिरवणुका, भाविकांची वाढणारी वर्दळ आणि वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असताना नगरपरिषदेकडून अद्याप ठोस हालचाल दिसत नसल्याने नागरिकांसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.
जुन्नर शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते तसेच गल्लीबोळांमधील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा आकार वाढला असून रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून याबाबत अपेक्षित हालचाल होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने त्यापूर्वी खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीयोग्य करण्याची मागणी होत आहे.
शहरातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या मोठ्या गतिरोधकांबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही ठिकाणी गतिरोधकांची उंची व रचना वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांसोबतच गतिरोधकांबाबतही योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मिरवणुकांपूर्वी रस्ते सुस्थितीत करा
गणेशोत्सवात शहरातील विविध मंडळांच्या आगमन व विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था कायम राहिल्यास मंडळांचे कार्यकर्ते, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि धोकादायक गतिरोधकांबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि त्रस्त नागरिकांकडून होत आहे.





