पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक घटना पाहिल्या आहेत. राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात, पोलीस ठाण्यात गोळीबार केला जातो, ड्रग्ज सापडत आहेत. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
काही कार्यक्रमांनिमित्त ठाकरे हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, आम्हांला कोणी हात लावू शकत नाही, अशी वल्गना काही आमदार पोलिसांबाबत करत आहेत. त्यामुळे हे सरकार बिल्डर, ठेकेदार की, सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे, असा सवाल उपस्थित करून ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
तर, भाजपने लोकशाही संपवली आहेच. २०२२ मध्ये शिवसेना, २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला. तसेच आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपला लोकशाही नको आहे, अशीही टीका ठाकरे यांनी केली. तरुणांनी अंमली पदार्थाला बळी पडू नये, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही टीका
मुख्यमंत्री हे अमावस्या-पौर्णिमेला शेती करायाला जातात. त्यामुळे सांताक्रुझ येथील पुलाचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.