नगर – नगर अर्बन मल्टिस्टेट बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या भाग भांडवलासाठी वापरलेली 2 कोटी 50 लाख रक्कम बॅंकेच्या घोटाळ्यातील असावी. याच कंपनीमार्फत बॅंकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आशुतोष लांडगे याने व्यक्त केली आहे. 150 कोटींच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीचीही चौकशी करावी, अशी मागणी लांडगे याने आर्थिक गुन्हे शाखेकडे एका पत्राद्वारे केली आहे.
आशुतोष लांडगे याने नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहाराबाबत सुरू असलेल्या तपासात याबाबत माहिती देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत. लांडगे याने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले की, तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार स्व. दिलीप गांधी व बॅंक कर्मचाऱ्यांनी परस्पर माझ्या व इतर खातेदारांच्या खात्यातून व कर्ज खात्यातून वेगवेगळ्या इतर खात्यात पैसे वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे. गांधी फिनकॉर्प लिमिटेड कंपनी ही 2017 मध्ये म्हणजेच अर्बन बॅंकेत कर्ज फसवणूक झाल्याच्याच वर्षी स्थापित झालेली आहे. या कंपनीच्या भाग भांडवलाचे 2 कोटी 50 लाख रुपये अर्बन बॅंक घोटाळ्यातील असण्याची दाट शक्यता आहे. बॅंक घोटाळ्यातील रोख रकमा सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी व त्यांचे भागीदार जयदीप पाटील यांनी गांधी फिनकॉर्प या कंपनीमार्फत देशाबाहेर नेऊन विल्हेवाट लावली असावी.
दिल्लीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सुवेंद्र दिलीप गांधी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणातील मोठ्या रकमा कोर्ट किंवा सदर प्रकरणातील फिर्यादीकडे जमा करण्याची दाट शक्यता आहे. याची सखोल चौकशी होऊन अर्बन बॅंकेच्या घोटाळ्यातील रोख रकमांची कशी विल्हेवाट लावली, याची शहानिशा होणे आवश्यक आहे. सुवेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी यांची चौकशी केल्यास तेच नगर अर्बन बॅंकेच्या 150 कोटी घोटाळ्यातील पडद्यामागचे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळतील, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तपासासाठी कागद पत्रे सादर करत असल्याचे लांडगे याने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.