वॉशिंग्टन – भारताने स्वदेशी तंत्रज्ञानातून 5 जी सुविधा विकसित असून ही सुविधा आम्ही इतर देशांसोबतही शेअर करण्यास तयार आहोत असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ ऍडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन म्हणाल्या भारताचे 5 जी तंत्रज्ञान अजून संपुर्ण देशातील लोकांपर्यंत पोहोचले नाही पण येत्या काळात त्याचा चांगला विस्तार होईल आणि त्यानंतर आम्ही जगातील अन्य देशांनाही हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ. आमचा 5G इतर कुठूनही आयात केलेला नाही. हे आमचे स्वतःचे उत्पादन आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
भारतात 5 जी सेवा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक भारतीय शहरांमध्ये सुरू केल्या आहेत. 2024 पर्यंत संपूर्ण देशात ही सेवा पोहचवली जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. आम्ही 5 जी विषयात जी कामगीरी केली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे असे त्या म्हणाल्या. डिजीटायझेशन क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठला आहे. त्यातून आमच्या देशातील शिक्षण, आरोग्य, आणि अन्य क्षेत्रातील सुविधांना त्याचा चांगला लाभ होतो आहे असे त्या म्हणाल्या.